जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 202236 शेतकऱ्यांचे 121628.88 हेक्टर क्षेत्राच्या शेती पिकांचे नुकसान
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
ऑक्टोंबरमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत, मात्र यातून जर कोणाचे पंचनामे करावयाचे राहिले असतील तर त्यांनी तातडीने तहसीलदारांकडे संपर्क साधण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्हयामध्ये ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासकीय स्तरावरून देण्यात आले होते. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पावसामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 202236 शेतकऱ्यांचे 121628.88 हेक्टर क्षेत्राच्या शेती पिकांचे नुकसान झाले असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. 
तर केव्हा ऑक्टोंबर मध्ये पडलेल्या पावसामुळे 298717 शेतकऱ्यांच्या 184135.17 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. काही क्षेत्रावरील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्याची प्रशासनाने सर्व प्रक्रिया राबविलेली आहे. तथापि काही पंचनामे करावयाचे राहिले असल्यास त्याबाबत जिल्हयातील शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून घेण्याचे आवाहन केले आहे. 
ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करावयाचे अद्याप बाकी असतील त्यांनी स्थानिक तहसीलदारांशी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शाखेमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून यामुळे आवश्यकतेप्रमाणे सुधारित अनुदानाची मागणी करता येणे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

