महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून संगमनेर पंचायत समितीने तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या थकलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीची तब्बल साठ लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळविले आहे अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारची वसुली करण्यात संगमनेर पंचायत समिती अव्वल ठरली.
गावच्या विकासात ग्रामपंचायतीचे योगदान महत्वाचे आहे. त्याकरीता घरपट्टी व पाणीपट्टीची वसूली देखील महत्वाची आहे. जनतेने सदरचा कर वेळेत भरल्यास विकासाच्या प्रक्रियेला हातभार लागण्यास मदत होते. नागरिकांनी कोणत्याही सरकारी कराचा भरणा करणे त्यांच्या हिताचे असते, मात्र ग्रामपंचायतीचा घरपट्टी, पाणीपट्टीचा कर थकविणारे अनेक महाभाग आहेत. वारंवार मागणी करून देखील घरपट्टी पाणीपट्टीचा भरणा न करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील १०२२० खातेदारांविरोधात थकबाकीचा भरणा करण्यासंबंधीच्या नोटीसा न्यायालयामार्फत बजाविण्यात आल्या होत्या. ही सर्व प्रकारने राष्ट्रीय लोक न्यायालयासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. यात २२४७ खातेदारांनी तडजोडीअंती ५९ लाख १३ हजार ९६० रुपयांचा भरणा केला आहे.
लोक न्यायालयाच्या माध्यमातून कशाप्रकारे कामकाज केले जाते, यासाठी संगमनेर वकील संघाचे पदाधिकारी ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील, मोहन फटांगरे यांनी जनजागृती करत लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. तर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय एच आमेठा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली न्यायाधीश एम. एच. शेख, न्यायाधीश एस. एस. बुद्रुक, न्यायाधीश पी. डी. देवरे यांच्यासमोर हे कामकाज चालले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कराची वसुली करण्यात संगमनेर पंचायत समिती अहमदनगर जिल्ह्यात अव्वल ठरली. या संदर्भाने न्यायाधीशांनी नुकताच पंचायत समितीचे सभागृहामध्ये ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त वसुली कशी करता येईल, या दृष्टीने मार्गदर्शन केले होते. यासाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी संगमनेर पंचायत समितीमार्फत उत्तम कामगिरी केली जाईल असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने दिले होते. संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले. त्याला तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कक्ष अधिकारी राजेंद्र तिटमे, विस्तार अधिकारी पंचायत राजेंद्र कासार, राजेंद्र ठाकूर, सुनील माळी, सदानंद डोखे यांनी परिश्रम घेतले.
या ग्रामपंचायतींनी केली मोठी वसुली
घुलेवाडी ७ लाख ६१ हजार ५४७, आश्वी बुद्रुक ५ लाख ७९ हजार, पेमगिरी ५ लाख ५१ हजार १२४, गुंजाळवाडी ४ लाख ८५ हजार ८०३, सुकेवाडी ३ लाख ८४ हजार ५०, वेल्हाळे ३ लाख ५६ हजार ८०, आंबी खालसा २ लाख ७१ हजार ५१३, समनापूर १ लाख ९४ हजार ९४०, निमगाव जाळी १ लाख ७८ हजार ४६६, मंगळापूर १ लाख १३ हजार २३५ रुपयांची वसूली करण्यात आली आहे. १९ ग्रामपंचायतीच्या वसूली शुन्य झाल्या आहेत.

