महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायटीच्या संस्था नियुक्त सचिवांची “स्वाभिमानी सचिव संघटना’ स्थापन करण्यात आली आहे.
नगरच्या मधुरंजनी सभागृहामध्ये नुकताच सहकारी सेवा सोसायटीच्या सचिवांचा मेळावा पार पडला. यामध्ये संस्था नियुक्त सचिवांच्या विविध मागण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. नगर जिल्ह्यात जवळपास २००-२५० सचिव हे संस्था नियुक्त आहे. महाराष्ट्रात सहकार हे शेतकरी विकासाचे नेहमी द्योतक राहिले आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी बांधवाला नेहमी न्याय देण्याचे व उभे राहण्याचे बळ दिले जाते. त्याच माध्यमातून ग्रामीण भागात सेवा सोसायटी ही शेतकऱ्याच्या थेट सेवेत असते.
जिल्हा बँकेच्या संलग्नतेतून शेतकरी बांधवाना कर्ज वाटप, विविध व्यवसाय व शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अशा महत्वाच्या भूमिकेत सोसायटी कामकाज करत असते. या सर्व कामकाजाचा मुख्य हिस्सा म्हणून नेहमी सचिवाला जबाबदारी पाडावी लागते. मात्र शासन स्तरावर सचिवाचा मात्र कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही. सचिव देखील संस्थेच्या अख्यारीत येणारे सर्वच काम करत असतात परंतु बँकेच्या माध्यमातून अश्या संस्था नियुक्त सचिवांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. जिल्हा बँक दरवर्षी सचिवाच्या पगाराकरिता अंशता निधीची तरतूद करते. सदरची रक्कम जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग करते परंतु संस्था नियुक्त सचिव यापासून नेहमी वंचित राहतात.
त्यामुळे संस्था नियुक्त सचिवांना जिल्हास्तरीय समितीमध्ये वर्ग करावे, सेवा नियम लागू करावा अशा विविध मागण्याना वाचा फोडण्यासाठी सचिवानी नगर येथे मेळावा घेतला. यावेळी या संघटनेची स्थापना करण्यात आली असून अकोले तालुका प्रतिनिधी गणेश रेवगडे यांनी सर्वांच्या वतीने संघटनेचे “स्वाभिमानी सचिव संघटना अहमदनगर’ असे नांव जाहीर केले. यावेळी सचिव बांधवाची भाषणे पार पडली. कर्जतचे भिवा कवडे यांनी संघटनेचे महत्व सांगितले तर नगरचे रावसाहेब सोनार यांनी संस्था नियुक्त सचिव यांच्या व्यथा मांडल्या.
यावेळी मुकुंद सातपुते (संगमनेर), रवी पवार (कोपरगाव), संतोष कळमकर (श्रीगोंदा), मंगेश देशमुख (पारनेर), सोमनाथ डांगरे (शेवगाव), भाऊसाहेब जगदाळे (जामखेड), संतोष पाटील (नेवासा), भाऊसाहेब सातपुते (राहता), भाऊसाहेब कदम (राहुरी) उपस्थित होते.

