महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
उसाच्या पाचटापासून तयार करण्यात आलेल्या सपराच्या घरात झोपेत असलेल्या ६५ वर्षीय वृद्धेवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाले असून वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
अकोले तालुक्यातील निळवंडे शिवारात असलेल्या खडके वस्तीवर ही दुर्घटना घडली आहे. रखमाबाई तुकाराम खडके असे या बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या वृद्धेचे नाव आहे. झोपेत असलेल्या वृद्धेवर अचानकपणे हल्ला केल्यानंतर बिबट्याने या वृद्धेस जवळपास शंभर फुटापर्यंत नेले यात या वृद्धेचा मृत्यू झाला.
घटनेच्या एक दिवस अगोदर याच ठिकाणाहून बिबट्याने शेळीवर हल्ला करत शेळी नेण्याची घटना घडली होती. त्यामुळे चटक लागलेला बिबट्या पुन्हा आला असल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे तर वृद्ध महिलेचे शव विच्छेदन अकोले ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली असून मदती संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवून शासन मदतीची रक्कम तातडीने संबंधित वृद्ध महिलेच्या वारसांना उपलब्ध करून देणार असल्याचे वनक्षेत्रपाल राजश्री साळवे यांनी म्हटले आहे. 
या घटनेने निळवंडे व परिसरातील गावामध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्याने शेतकरी हैरान झाले असून बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी शेतीची कामे कशी करायची या चक्रव्यूहात अडकले आहे. या परिसरात पूर्वीपासून बिबट्याचा वावर असला तरी यात आता वाढ झाली आहे. बिबटे माणसांवर हल्ले करू लागल्याने वनविभागाने या नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे. 
तालुक्यात उसाचे प्रमाण वाढले असल्याने बिबट्याचा वावर जास्त प्रमाणावर वाढला आहे. शिकारीसाठी बिबट्याचा वावर मानवी वस्तीमध्ये वाढला असून अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये म्हणुन, सर्व नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी, विशेष:ता लहान बालकांवर लक्ष ठेवावे.
राजश्री साळवे, वनक्षेत्रपाल, राजुर.

