महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पंचायत राज व्यवस्थेसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देताना सहकार साहित्य, समाजकारण, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रात दिशादर्शक काम करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रोवला. ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने यशवंत तीर्थ येथे चव्हाण यांच्या ३८ पुण्यतिथी अभिवादन समारंभात संगमनेरमध्ये थोरात बोलत होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, डॉ. बी. एम. लोंढे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, प्रा. एस. टी. देशमुख, प्राचार्य जे. बी. शेट्टी, शीतल गायकवाड, अंजली कन्नमवार, नामदेव गायकवाड, प्रा. जी. बी. काळे, आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, एकाच व्यक्तीमध्ये अनेक गुण असलेले स्वर्गीय यशवंतरावांचे व्यक्तिमत्व हे प्रेरणादायी होते. देवराष्ट्रे ते दिल्ली या त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी साधेपणा, नीतिमत्ता कायम जपली. कृतज्ञता, सुसंस्कृतपणा, समय सूचकता, जाणीव, दूरदृष्टी या गुणांबरोबर त्यांना साहित्याची विशेष आवड होती. अनेक ठिकाणी त्यांनी अत्यंत खंबीरपणे व दूरदृष्टीने निर्णय घेतले. त्यांच्या संरक्षण मंत्री पदाच्या काळात चीन सोबत झालेल्या युद्धात भारताला मोठा विजय मिळाला होता.
अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, उपपंतप्रधान असे केंद्रात विविध पदे भूषवताना त्यांनी कधीही साधेपणा सोडला नाही. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीत मोठे योगदान त्यांचे राहिले. याचबरोबर राज्याच्या कृषी, औद्योगिक क्रांतीचा पाया त्यांनी घातला. चव्हाण यांनी सुसंस्कृत सहकाऱ्यांची राज्यात मोठी फळे उभी केली. 
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी यशवंतराव यांना कायम आदर्श मानले. आजच्या राजकारणातही त्यांचे व्यक्तिमत्व आदर्शवत असून पुढील अनेक पिढ्यांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरणारे आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात यशवंतपर्व कायम राहिले, असे थोरात म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेक धुमाळ यांनी, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी आभार मानले.

