महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
तुझी प्रकृती खराब असल्यामुळे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेत आहोत, असे कारण सांगत एका दहशतवाद्याला मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमधून बाहेर काढण्यात आले. आणि योग्य ती सुरक्षेचे सर्व प्रकारची काळजी घेत या दहशतवाद्याचा प्रवास पुण्याच्या येरवडा जेलच्या दिशेने सुरू झाला. केवळ दोन अधिकाऱ्यांशिवाय तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला याबाबत माहिती नव्हती की आपण कोणाला आणि कोठे घेऊन चाललो आहोत. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर सर्वांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी येरवडा जेलमध्ये कुख्यात दहशतवादी अजमल कसाब याला फाशी दिल्यानंतर पथकातील सर्वांना समजले की आपल्या सोबत कोणाला आणण्यात आले होते.
26/11 ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला अजूनही थरकाप उडवणारा अनुभव ठरतो. या हल्यात सुमारे 170 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात सामील असलेल्या अजमल कसाब याला अचानक फाशी दिल्याची घोषणा करण्यात आली. वास्तविक कसाबला स्वतःलाही याची कल्पना नव्हती की, त्याला फाशी दिली जाणार आहे. त्याला खोटे सांगून मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून बाहेर काढण्यात आले होते. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये गुप्तपणे त्याला फाशी देण्यात आली होती.
या सिक्रेट ऑपरेशनचे प्रमुख पोलिस अधिकारी प्रवीणकुमार पाटील यांनी आता हे गुपित उघड केले आहे. त्यांचा हा अनुभव सांगताना पाटील म्हणाले, “या हल्ल्यात एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाब याला 4 वर्षांनंतर फासावर लटकावण्यात आले. त्यासाठी राबविलेले ऑपरेशन-एक्स अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. फाशीच्या 27 तासांआधी त्याला ऑर्थररोड जेलमधून काढले. मध्यरात्री 1 वाजता पोलिस फोर्स 150 किमीवर असलेल्या येरवडा कारागृहाच्या दिशेने निघाला. वाहनात बसलेला कसाब अन् सुरक्षा पुरविणारी यंत्रणा फाशीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती.”
पाटील म्हणाले, “कोर्टाचा निकाल व दया याचिका फेटाळल्यामुळे अतिरेकी मोहंमद अजमल अमीर कसाबची फाशी निश्चित झाली. मुंबई पोलिसांना कसाब याला फाशीसाठी मध्यवर्ती येरवडा कारागृहात तातडीने हलविण्याचा गोपनीय आदेश मिळाला होता. तत्कालीन सहपोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी ऑपरेशन एक्ससाठी माझ्यावर जबाबदारी सोपविली. तेव्हा मी परिमंडळ 12 चा उपायुक्त होतो.” निर्णय झाल्यानंतर आम्ही अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. कसाबला तुझी प्रकृती खराब असल्यामुळे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेत आहोत, असे कारण सांगण्यात आले होते. तपास अधिकारी रमेश महाले यांनी संपूर्ण रस्त्यात कसाबला बोलण्यात गुंतवून ठेवलेले होते.
आदेशाप्रमाणे मध्यरात्री 1 वाजता कसाबला घेऊन फोर्स – 1 कमांडोंचा ताफा पुण्याकडे रवाना झाला. साधा वेष अन दिवे नसलेल्या तीन स्कॉर्पिओचा ताफा मुंबई-पुणे महामार्गावर होता. ताफ्याच्या दोन किमी मागे व पुढे एसआरपीची दोन प्लॅटून ठेवण्यात आल्या होत्या. शस्त्र व दारुगोळांनी युक्त कमांडो, एसआरपी जवानांनाही वाहनात कसाब असल्याचे अन् वाहन कुठे जात असल्याची माहिती नव्हती, असे पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, ” ताफ्याला अडसर नको म्हणून मार्गावरील पुणे शहर, ग्रामीण व रायगड पोलिसांना केवळ ट्रॅफिक काढण्याचीच ड्यूटी देण्यात आली होती. सुरक्षेसाठी प्रवासाचे सहा टप्पे करून ठरलेला पासवर्ड वरिष्ठांना वेळोवेळी कळवला जात होता. अधिकारी दाते सतत संपर्कात होते. सलग 3 तास प्रवासानंतर पहाटे 4 वाजता अजमल कसाब याला येरवडा कारागृहाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर 24 तासांनी अर्थात दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबर 2012 रोजी अजमल याला फासावर चढवण्यात आले. ”
या ऑपरेशन साठी सहा पासवर्ड ठरले होते. त्यापैकी ‘स्टार्टेड टू अल्फा’ अर्थात ऑर्थररोड कारागृहातून रवाना हा पहिला पासवर्ड होता. येरवडाला पोहचल्यावर शेवटचा पासवर्ड ‘रिच फॉर फॉक्स’ हा अधिकारी दाते यांना पाठविण्यात आला, असे पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले, ” त्या दिवशी रात्री 8 वाजता अधिकाऱ्यांनी मला बोलावले. ‘बॅगा तयार ठेवा, दोन तासांत बोलवतो, घरीही सांगू नका,’ अशी सूचना केली होती. प्रवासात अजमल कसाब शांत होता. येरवडा कारागृहात आल्यानंतरही कमांडो ताफा अनभिज्ञ होता. प्रवासामुळे त्यांना विश्रांतीची सूचना केली गेली. तत्पूर्वी सर्वांचे मोबाइल एकत्र जमा करण्यात आले. कोणीही बाहेर पडायचे नाही, असा आदेश झाला. कसाबच्या फाशीनंतर ताफ्यातील कर्मचाऱ्यांना वाहनात कसाब होता याची माहिती झाली.”

