महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सोलापूर मध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद सुरू असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाईफेक करत घोषणाबाजी केली. सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाही विरोध केला होता, अशा घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी निषेध केला.
यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी या प्रकारावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मला शरद पवार, उद्धव ठाकरे,अजित पवार यांची कीव येते. “त्यांना माझा संवाद होऊ द्यायचा नाही. आज संविधानाच्या दिवशी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सेल्युलर जेलमध्ये उपवास करून आलेली माणसं आहोत. आम्हाला या गोष्टी ‘पाणी कम चाय’ आहेत. मी शाईफेक करणाऱ्यांचा धिक्कार करणार नाही. उलट मला शरद पवार, उद्धव ठाकरे,अजित पवार यांची कीव येते,” अशी टीका गुणरत्न सदावर्तेंनी केली.
“आज भारतीय संविधान दिन आहे. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, संजय राऊत, बिळातले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिलावळींना माझ्या संवाद यात्रेने सळो की पळो केलं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या असंवैधानिक वर्तणुकीवर योग्यवेळीच कारवाई केली पाहिजे. संविधान दिनी असे हल्ले करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. शरद पवार, अजित पवार माफी मागणार आहेत की नाही,” असा प्रश्न सदावर्तेंनी यावेळी विचारला.

