महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी रायतेवाडीमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये बनावट मद्य निर्मितीचा कारखाना आढळून आला होता. राज्यात प्रतिबंधित असलेली दारू नामांकित कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून त्याचे वितरण केले जात असल्याचे समोर आल्यानंतर संगमनेर आणि अकोल्यातील परमिट रूमवर कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सील केलेले हे परमिट रूम पुन्हा चालू झाल्याने दारूबंदी समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
रायतेवाडी येथील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून एका घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असलेले गोवा आणि दमण येथील दारू आढळून आली होती. घरगुती पद्धतीने नामांकित कंपन्यांच्या बॉटलमध्ये या दारूचे रिफिलिंग केले जात होते. याप्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी एकाच्या परमिट रूममध्ये या दारूची संगमनेर आणि अकोल्यात विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. बनावट दारूमुळे अनेकांचे प्राण जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेकांना दुर्धर आजार झाले. मात्र या व्यवसायातून संगमनेर शहरातील सुरभी बारचे मालक मालामाल झाले. त्यांच्याच माध्यमातून संगमनेर अकोल्यात या दारूची विक्री होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ही दोन्ही दुकाने सील करण्यात आली होती.
आरोपींना न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाई विरोधात दुकान मालकांनी वरिष्ठांकडे दाद मागितली. त्यांच्यावर झालेल्या दंडात्मक कारवाईनंतर ही दुकाने पुन्हा सुरू करण्यात आल्याने संतापलेल्या दारूबंदी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी समितीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी तालुक्यातील घुलेवाडी येथील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
बनावट दारू निर्मिती करणे, तिची विक्री करणे याप्रकरणी पकडलेल्या आरोपी आणि त्यांच्या अधिकृत परवाना कक्षावर कारवाई करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे अशी मागणी मोर्चेकर्यांनी केली. समितीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब हासे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी जर कारवाई केले नाही तर आम्ही सदर दुकाने बंद करू. यावेळी दलित पॅंथरचे सोमनाथ भालेराव, गोविंद नागरे, शहराध्यक्ष संभव लोढा, रंगनाथ फटांगरे, सचिन साळवे, राजू सातपुते, योगेश खेमनर, लखन सोन्नर, फैसल सय्यद, आशा केदारी संगीता गायकवाड आदींची भाषणे झाली.
परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे
संबंधितांचे परवाने रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत. मात्र येथील अधिकारी त्यांच्या कामात कसूर करत असून आरोपींना सहकार्य करत आहेत. संगमनेर अकोल्यातील हे दोन्ही बार सील करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, यासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करतानाच नगर येथील अधीक्षक कार्यालय आयुक्त कार्यालय आणि मंत्रालयावर मोर्चा देखील काढू. याची सर्वस्वी जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांची असेल.
अमर कतारी, जिल्हाध्यक्ष ग्रामीण दारूबंदी समिती.

