महाराष्ट्र संवाद न्यूज
ट्रॅक्टर, पिकअप आणि दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातामध्ये दोघा दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत पावलेले दोघेही तरुण नात्याने चुलत भाऊ असून तालुक्यातील वडगाव पान येथील रहिवासी आहे.
आकाश विलास कुळधरण आणि ऋषिकेश विजय कुळधरण अशी या दोघा मृत भावंडांची नावे आहेत. कोल्हार-घोटी राज्यमार्गावर मांची फाटा येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात घडला. दोघा भावंडांच्या अपघाती मृत्यूने वडगाव पान गावात हळहळ व्यक्त होत आहे.
लोणीकडून संगमनेरच्या दिशेने येत असलेली पिकअप आणि मांची फाट्याकडे वळण घेत असलेला ट्रॅक्टर यांचा अपघात झाला. याच दरम्यान दुचाकीवरून जात असलेले दोघे तरुण या अपघातात सापडले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी पिक अप चालकाचा शोध घेण्यासाठी जवळच्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. मात्र त्याचा शोध लागू शकला नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

