महाराष्ट्र संवाद न्यूज
महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह राज्यातील महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने तातडीने कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी शुक्रवारी संगमनेर शहर व तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सह्यांची मोहीम उघडली आहे. बस स्थानक चौकात एका भल्या मोठ्या फ्लेक्स बोर्डवर ही सह्यांची मोहीम सुरू आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महापुरुषांविषयी वारंवार अवमानकारक वक्तव्य करत आहे. राज्य त्यांच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झालेले असताना केंद्र सरकारकडून त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. राज्यातील सत्ताधारी देखील त्यांची पाठराखण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. विरोधी पक्षाने देखील त्यांना केंद्र सरकारने परत बोलावून घ्यावे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा उद्रेक होईल अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राज्यपाला विरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांना तातडीने परत बोलावून कार्यमुक्त करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी संगमनेरकरांचा या मोहिमेला मोठा पाठिंबा मिळाला. बस स्थानक चौकातील फ्लेक्सवर संगमनेरकर नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आदींनी सह्या करण्यासाठी गर्दी केली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव, शहराध्यक्ष राहूल वर्पे, मनिष माळवे, किरण घोटेकर, अमोल राऊत, गजानन भोसले, अशोक काळे, नितीन आहिरे, प्रसाद काठे, केवल आव्हाड आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.



