महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निळवंडेच्या बंद पडलेल्या कामासाठी मोठा निधी मिळविला. कामाला गती देत ऑक्टोंबर २०२२ पर्यंत कालव्याद्वारे पाणी देण्याचे नियोजन होते. मात्र जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि निळवंडे धरणाचे काम पुन्हा बंद पडले. कालव्याची कामे बंद पाडणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नामध्ये माती कालविण्यासारखे आहे, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर सत्कार करण्यात आला. यावेळी थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे माधवराव कानवडे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात, थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, निळवंडे धरणातून कालव्याद्वारे दुष्काळी भागाला पाणी देणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणीवर मात करून निळवंडे धरण आपण पूर्णत्वास नेले. बोगद्यांची कामे मार्गी लावली. नंतरच्या काळात २०१४ ते २०१९ मध्ये झालेल्या सत्तांतरामुळे कामे थंडावली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा या कामाला मोठा निधी मिळवत गती दिली. रात्रंदिवस काम सुरू होते. मात्र पुन्हा झालेल्या सत्तांतरामुळे काम थांबले आहे. कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे. निळवंडेचे पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतात गेले पाहिजे. यासाठी आपला कायम आग्रह असेल.
अनेक अडचणीतून मार्ग काढत मोठ्या कष्टाने संगमनेर तालुक्याने प्रगती साधली आहे. येथील विकास सहकार राज्यासाठी आदर्शवत ठरला. सध्या संकटकाळ आहे, तरी प्रत्येकाने आपली जबाबदारी मनापासून पार पाडत तालुक्याच्या विकासा पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन करत संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. तालुक्याच्या यशामध्ये सर्वांचा वाटा असल्याने संगमनेरचा राज्यात नावलौकिक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सुधीर तांबे म्हणाले, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात राज्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तालुका सहकार पंढरी म्हणून ओळखला जातो.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मिलिंद कानवडे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बाबा ओहोळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.
माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते झाला ‘यांचा’ सन्मान
थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांचा राज्य सहकारी साखर संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, सुधाकर जोशी, ॲड. नानासाहेब शिंदे यांचा अमृतवाहिनी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, संपत डोंगरे व सुनील कडलग यांचा शेतकी संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, राजेंद्र गुंजाळ व महेश मोरे यांचा हरिश्चंद्र फेडरेशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि ॲड. सुहास आहेर व विठ्ठलदास आसावा यांचा संगमनेर एग्रीकल्चर मार्केटिंग प्रोसेसिंग कंपनीच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याशिवाय थोरात कारखान्यातील तिघा निवृत्त कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

