महाराष्ट्र संवाद न्यूज
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयान दिलासा दिला आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
१ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर देशमुख यांचा जामीन मंजूर झाला असल्याने तब्बल तेरा महिन्याच्या कालावधीनंतर देशमुख यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सीबीआयच्या सत्र न्यायालयानं अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला होता. त्याला देशमुख यांच्यावतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
न्यायालयासमोर याप्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती आणि न्यायालयाने सोमवारपर्यंत या संदर्भातील निकाल राखून ठेवला होता.
सोमवारी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी निकाल देताना अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. यात न्यायालयान काही अटी समोर ठेवल्या आहेत. यात अनिल देशमुख यांना आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करावा लागणार असून आठवड्यातून दोन दिवस ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
दरम्यान नव्याने मिळालेल्या माहितीनुसार देशमुख यांना जामीन मंजूर करण्याच्या आदेशाला पुढील दहा दिवसांसाठी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सीबीआय जामिनाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे देशमुख यांना अजून दहा दिवस कोठडीत राहावे लागणार आहे.


