शिवसेनेच्या आंदोलनाला मोठे यश आंदोलकांपुढे झुकले महावितरणचे अधिकारी
महाराष्ट्र संवाद न्यूज
विविध कारणांमुळे महावितरण विरोधात संगमनेरकरांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. महावितरणच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी संगमनेर शहर शिवसेना आणि संलग्न संघटनांनी (ठाकरे गट) महावितरणच्या कार्यालयावर हातात ‘दंडुके’ घेत हल्लाबोल करण्याचा इशारा देतात नरमलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तलवारी म्यान करत आंदोलकांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केल्याने होऊ घातलेले आंदोलन थांबले आहे.
विज बिलासंदर्भात तक्रार असलेल्या कोणत्याही ग्राहकाची वीज जोडणी आता तोडली जाणार नाही, हे शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळालेले मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे. आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करत झालेल्या चर्चेदरम्यान यासंदर्भात आंदोलकांना लेखी पत्र देण्यात आले आहे.
संगमनेर शहर व तालुक्यामध्ये विविध वीज समस्या, चुकीच्या पद्धतीने आकारले जाणारे वीज बिल, नादुरुस्त मिटर, सरासरी आकारणी, तक्रारीची पोचपावती न देणे, कर्मचारी अधिकाऱ्यांकडून ग्राहकांची अरेरावीची उद्धट भाषा वापरली जाणे आदी प्रमुख तक्रारीच्या अनुषंगाने ७ डिसेंबरला शिवसेनेने हातात दंडूके घेत २२ डिसेंबरला महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता. शिवसेनेच्या ठाकरे गटाने केल्या अनेक दिवसांपासून खदखदत असलेल्या विषयावर आंदोलनाचा इशारा दिल्याने या आंदोलनाला जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त होऊ लागले होते.
त्यामुळे याची गंभीरतेने दखल घेत महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी आंदोलकांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले, आणि त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान त्यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच आंदोलकांच्या मागण्या करत या संदर्भात लेखी पत्रही शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांना दिले. आंदोलकांनी आपल्या मागण्यांसंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ग्राहकांना मीटर वाचन प्रमाणे अचूक बिल दिले जातील याची दक्षता घेण्याबाबत संबंधित उपकार्यकारी अभियंता, कक्ष अभियंता, बिलिंग स्टाफ यांना आदेश देण्यात आले. ज्या वीज ग्राहकांना सरासरी बिल देण्याशिवाय पर्याय नाही, अशाच वीज ग्राहकांना मागील एक वर्षाची सरासरी पाहून विज बिल आकारणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मीटर वाचन अचूक घेण्याच्यादृष्टीने उंचावरील मीटर तसेच घरामधील मीटर बाहेर बसवणे बाबत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश संबंधित कक्ष अभियंत्यांना देण्यात आले.
ग्राहकांची वीजबीला संबंधाची तक्रार असल्यास त्याची संबंधिताकडे पोहोच पावती असल्यास सदर ग्राहकांचे विज बिल दुरुस्ती होईपर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार नाही याबाबत सुद्धा महत्त्वाचे निर्देश कार्यकारी अभियंता थोरात यांनी आपल्या यंत्रणेला दिले. संगमनेर उपविभागातील उपविभाग प्रमुख, कक्ष अभियंता, तांत्रिक कर्मचारी, बिलिंग विभागातील कर्मचारी तसेच बाह्य स्त्रोत कर्मचारी यांना वीज ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वीज ग्राहकांची गैरसोय टाळण्याचा हेतूने तसेच त्यांना सुविधा मिळण्यासाठी उपविभाग कक्ष कार्यालय परिसरात ग्राहक तक्रार कक्षाची निर्मिती करून त्या ठिकाणी जबाबदार अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करून पावर हाऊस परिसरात दर्शनी भागात दिशादर्शक कार्यपद्धतीचा फलक लावण्यात येईल, जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा योग्य वेळेत होईल.
संगमनेर उपविभागातील नादुरुस्त मीटर बदलण्याची मोहीम वरिष्ठ कार्यालयाकडून मीटर उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल. सद्यस्थितीत शिवसेनेचा अर्ज आल्यापासून आत्तापर्यंत ४५० नादुरुस्त मीटर बदलून देण्यात आले. मीटर वाचन व नवीन कनेक्शन देणे बाबतीत सर्व तात्कालीन तक्रारी त्वरित सोडवण्यात येतील वरील प्रमाणे सर्व उपाययोजना तातडीने करून ग्राहक सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शिवसेनेला देण्यात आलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेना जेष्ठ नेते, जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख, उप जिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, सदाशिव हासे, एस. पी. राहणे, शहर कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, उपशहर प्रमुख दीपक वनम, इम्तियाज शेख, वेणुगोपाल लाहोटी, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख शितल हासे, संगीता गायकवाड, आशा केदारी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहरप्रमुख अमोल डुकरे, अक्षय बिल्लाडे, अक्षय गाडे, राजू सातपुते, सचिन साळवे, सुनील रूपवते, प्रशांत खजुरे, गोविंद नागरे, हर्ष कतारी, फैसल सय्यद, दानिश पारवे, संभव लोढा, त्रिलोक कतारी, फरोज कतारी, भगवान पोपळघट, माधव फुलमाळी आदी उपस्थित होते.
तर कोणत्याही क्षणी होऊ शकते हल्लाबोल आंदोलन
शिवसेनेने आंदोलन मागे घेतले असले तरी २० डिसेंबर ते २२ डिसेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयासमोर बस स्टँड परिसरात मंडप टाकत शिवसेनेच्या वतीने ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू करणार आहोत. वीज ग्राहकांच्या महावितरण संदर्भातील तक्रारी या केंद्रात स्वीकारल्या जातील. आलेल्या तक्रारी लगेचच सोडविण्यासाठी संबंधितांचे अर्ज महावितरणला देऊन त्याच्या पावत्या संबंधितांना दिल्या जातील. जोपर्यंत ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत महावितरणचे कोणीही विजेची जोडणी तोडण्यास आल्यास याची माहिती ग्राहकांनी त्वरित शिवसेना पदाधिकाऱ्यांना द्यावी. संबंधित पदाधिकारी लगेचच महावितरणला या संदर्भात जाब विचारतील. मागण्यांची दखल घेतली न गेल्यास यापुढील काळात शिवसेना कोणतेही निवेदन न देता महावितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करेल.
अमर कतारी, शिवसेना शहर प्रमुख.

