महाराष्ट्र संवाद न्यूज
खंडणीसाठी धान्य व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होती. नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाचा शुक्रवारी न्यायालयाने अंतिम निवाडा केला आहे. विशेष मोक्का न्यायाधीश आदिती कदम यांनी आरोपींपैकी दोघाजणांना दोषी ठरविले असून त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर उर्वरित तिघा आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केले आहे.
राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित बाफना हत्याकांडा बाबत नासिक जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती. चेतन यशवंतराव पगारे (वय २५ वर्ष, रा. ओझर टाऊनशिप) व अमन प्रकटसिंग जट (वय २२ वर्ष, रा. केवडीबन, पंचवटी) या दोघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. तर संशयित आरोपी अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे (वय २१ वर्षे रा. नांदूर नाका), संजय रणधीर पवार (वय २७ वर्ष रा. महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) आणि पम्मी भगवान चौधरी (वय ३२ रा. भारतनगर, वडाळा रोड) या तिघांची न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
ओझर येथील धान्य व्यापारी गुलाबसिंग बाफना यांचा मुलगा बिपिन याचे खंडणीसाठी अपहरण करून खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. आडगाव ते विंचूर गवळी रस्त्यावरील एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला होता. खंडणी वसूल करण्याचा बनव करत संशयतांनी या मुलाचे अपहरण करीत त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले होते. २०१३ मध्ये झालेल्या या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव देखील असल्याचे सांगितले जात होते. पोलीस तपासामध्ये या प्रकरणी संशयित चेतन यशवंतराव पगारे, अमन प्रकटसिंग जट, अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे, संजय रणधीर पवार आणि पम्मी भगवान चौधरी यांना अटक केली होती.
संशयित पाचही आरोपीं विरोधात मोक्का अन्वये कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली होती. संशयित आरोपी २०१३ पासून मध्यवर्ती कारागृहात होते. न्यायालयासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान पोलीस अधिकारी साक्षीदार आणि पंचांचे जबाब नोंदविण्यात आले होते. त्याची खातरजमा न्यायालयाने केली.
सुनावणीचे कामकाज संपल्यानंतर दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने याप्रकरणी चेतन यशवंतराव पगारे आणि अमन प्रकटसिंग जट या दोघांना दोषी ठरविले होते तर अन्य आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली होती. दोषी ठरविलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी कलम २०१ प्रमाणे सात वर्षे शिक्षा व दहा हजार रुपये दंड, कलम ३४३ प्रमाणे दोन वर्ष शिक्षा व ५००० रुपये दंड, प्रत्येकी एक लाख रुपये नुकसान भरपाई, आणि कलम ३०२, ३६४(अ) आणि कलम १२०(ब) प्रमाणे मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता अभय मिसर यांनी काम पाहिले.
असा आहे घटनाक्रम
■ ९ जून २०१३ रोजी नाशिक मधील धान्य व्यापारी गुलाबसिंग बाफना यांचा २२ वर्षीय मुलगा बिपिन बाफना बेपत्ता झाला.
■ १० जूनला बिपिनच्या अपहरणाची तक्रार
■ १३ जूनला आडगाव शिवारात एका शेतात मृतदेह आढळला.
■ १५ जूनला पंचवटी पोलिसांनी आरोपींना अटक केली.
■ न्यायालयीन खटल्यात सरकारी पक्षातर्फे ३५ साक्षीदार तपासले गेले.
■ वापरलेली शस्त्र, ‘सीडीआर’ व तांत्रिक तपासासह प्रत्यक्ष सबळ पुराव्यांवरून आरोपींचा सहभाग निष्पन्न.
■ १३ डिसेंबर २०२२ अंतिम युक्तिवाद.
■ १५ डिसेंबरला शिक्षेसंदर्भात युक्तिवाद.
■ १६ डिसेंबरला सत्र न्यायालयाने दोन आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

