महाराष्ट्र संवाद न्यूज
धर्मांतराच्या कारणावरून संगमनेरच्या उपनगरामध्ये दोन गटांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय हस्तक्षेपानंतर हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. दोन्ही गटाच्या आक्रमकतेनंतर शहर पोलिसांनी सामंजस्याचा मार्ग निवडत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळले.
शहरातील उपनगरात काही लोकांना हेरून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याच्या संशयावरून काही तरुणांनी धर्मांतर करू पाहणाऱ्या लोकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता धर्मांतर करून घेऊ पाहणाऱ्या आणि त्यांना जाब विचारणारामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. राहुरी येथील धर्मांतराचे प्रकरण ताजे असतानाच संगमनेर असा प्रकार घडत असल्याच्या समस्यावरून निर्माण झालेला दोन गटातील तणाव बराच काळ सुरू होता.
उपनगरामध्ये दुसऱ्या धर्मियांबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते. याची माहिती मिळाल्याने काही तरुणांनी घटनास्थळी जात यासाठी मज्जाव केला. या दरम्यान झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे दोन गटात वादावादी आणि धक्काबुक्की झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे वाढलेला गोंधळ थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचला. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रारी सुरू झाल्यानंतर एकमेकांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली.
दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी सामंजस्याचा मार्ग निवडत दोन्ही गटात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. यातून झालेल्या प्रकारासंदर्भात शहर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्याची तयारी दर्शविली त्यानंतर निर्माण झालेला वाद संपला. त्यानंतर पोलिसांनी घटनेत निष्पन्न झालेल्या एका व्यक्तीच्या नावासह आणखी काही जणांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.

