महाराष्ट्र संवाद न्यूज
महसूल खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या ‘रिटायर्ड रेव्हून्यू ऑफिसर’ या व्हाट्सअप ग्रुपवरील सदस्यांचा स्नेह मेळावा (गेट-टुगेदर) नुकताच अहमदनगरमध्ये पार पडला. सेवानिवृत्त झालेल्या जवळपास 90 अधिकाऱ्यांनी या स्नेह मेळाव्याला हजेरी लावली होती.
सेवानिवृत्त नायब तहसीलदार शशिकांत मरकड यांनी ‘रिटायर्ड रेव्हून्यू ऑफिसर’ या नावाने महसूल खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप केला आहे. या ग्रुपवर अधिकाऱ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण सुरू असते. यातूनच शालेय विद्यार्थ्यांच्या आणि नंतर नोकरी व्यवसायानिमित्त इतरत्र गेलेले लोक व्हाट्सअपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले. त्यांचे स्नेह मेळावे सुरू झाले. याच पार्श्वभूमीवर सेवानिवृत्तीनंतर एकमेकांच्या संपर्कात असलेल्या या ग्रुपच्या माध्यमातून स्नेहमेळावा घेण्याची कल्पना पुढे आली.
लगेचच स्नेह मेळाव्याची तारीख आणि ठिकाण निश्चित झाले. अहमदनगर मधील आकाशवाणी चौकात असलेल्या रोझ गोल्डमध्ये हा स्नेह मेळावा घेण्याचे निश्चित झाले. सर्व मित्रांना व्हाट्सअपवरून निरोप देण्यात आले. सेवानिवृत्ती झाली असली तरी नोकरी निमित्ताने जुळलेले स्नेहबंध या माध्यमातून पुन्हा एकदा जुळले गेले.
सेवानिवृत्तांच्या या ग्रुपवर बऱ्यापैकी वयाची 80 वर्ष उलटलेले अधिकारी आहे. या सर्व ऋषिकुल्य महसूल अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा सन्मान आणि गुरुवृत्तीचा आदर करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे स्नेह मेळावा नगरमध्ये पार पडला. या स्नेह मेळाव्यासाठी 90 सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते.
व्हाट्सअप ग्रुपमधील सर्वांनीच सेवेत असताना कुटुंबापेक्षा जास्त वेळ आपल्या कार्यालयाला दिलेला होता. या काळात अनेक अधिकाऱ्यांची त्यांचा स्नेहबंध निर्माण झाला. सेवानिवृत्तीनंतर अनेकांच्या भेटीगाठी नव्हत्या. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांच्याच एकमेकांशी गळाभेटी झाल्या. अगदी काहींचे आनंदाश्रूदेखील वाहिले गेले. काही अधिकारी, कर्मचारी आता हयात नसल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
ऋषितूल्य महसूल अधिकाऱ्यांचा सन्मान आणि त्यांच्या गुरुवृत्तीचा यावेळी उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी गोविंदराव क्षीरसागर, चंद्रकांत आकडे, डी. एस. लोखंडे, सेवानिवृत्त तहसीलदार के. बी. फाळके, जी. जी. कुलकर्णी, डी. के. टकले, बी. आर. नाबरिया, बी. आर. वाव्हळ, एम. बी. पवार, रमाकांत देवचक्के, चंद्रकांत कासार, हिरालाल बोरुडे यांचा समावेश होता. तर बापू जोशी आणि वसंतराव कापडी हे व्यक्तिगत कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त तहसीलदार गुलाबराव पादीर यांनी केले. त्यांना कृष्णा वालझाडे, अशोक कोल्हे यांनी सहकार्य केले. जीवन क्षीरसागर यांनी आभार मानले. सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी बोरुडे, रक्ताटे, आणि लवांडे यांनीदेखील हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.
सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचा परिचय व आठवणी, दुपारच्या सत्रात स्नेह भोजनानंतर सदस्यांचे एक तासाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. यात रमेश राजगुरू, विजय भालेराव, खरपुडे, डावरे, सर्वोत्तम क्षीरसागर आदींनी सहभाग घेतला. सायंकाळी चहापानानंतर या स्नेह मेळाव्याचा समारोप करण्यात आला. दिवसभराच्या या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त नायब तहसीलदार अनिल सोमणी यांनी केले. आनंदी मनाने सर्वजण मैत्रीची ताजी शिदोरी घेऊन घरी परतले. सर्वांनी एकत्रित मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

