महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरमधील अमृतवाहिनी महाविद्यालयात शिकणाऱ्या संकेत नवले या विद्यार्थ्याच्या हत्येला पंधरा दिवसांचा कालावधी उलटत आला तरी पोलीस अद्याप मारेकऱ्यांचा शोध लावू शकले नाही. यामुळे पोलीस यंत्रणेच्या निषेधार्थ नवलेवाडी (अकोले) येथे नागरिकांनी गुरुवारी सायंकाळी मशाल मोर्चा काढला होता.
संकेत नवले याचा मृतदेह आठ डिसेंबरला शहरानजीकच्या सुकेवाडी रस्त्यावर एका नाल्यात आढळून आला होता. संकेत नवले याचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून केला असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेला जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटत असताना पोलिस अद्याप या खून प्रकरणाचा काहीही उलगडा करण्यास अपयशी ठरले आहे. खून प्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांच्या हाती कोणतेही पुरावे लागू शकलेले नाही. त्यामुळे संकेतच्या मारेकरांचा शोध घेणे दिवसेंदिवस पोलीस यंत्रणेसाठी आव्हान बनत चालले आहे.
नवलेवाडी (अकोले) येथील संकेत संगमनेरमध्ये शिक्षण घेत होता. त्याची हत्या केल्याचे समोर आल्यानंतर संगमनेर शहर अकोल्यामध्ये खळबळ उडाली होती. एरव्ही सुतावरून स्वर्ग गाठणारी पोलीस यंत्रणा देखील अद्याप मारेकरी तर दूरच पण खून प्रकरणाचा धागादोराही शोधू शकलेले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांपासून सर्वच पोलिस यंत्रणा खून प्रकरणाचे गूढ उलगडण्याच्या कामाला लागलेली आहे.
संकेतच्या मारेकऱ्यांचा शोध लागत नसल्याने नातेवाईक तसेच नवलेवाडी परिसरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे नवलेवाडी ग्रामस्थानी बैठक घेऊन पोलिसांना दशक्रीया विधी होईपर्यंत तपासाला वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, संकेतचा दशक्रियाविधी होऊन दोन दिवस उलटून गेल्यानंतरही पोलीस यंत्रणेला हत्येप्रकरणी एकही पुरावा हाती लागला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या तपासाविरोधात नवलेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत विशेष ग्रामसभा घेऊन मशाल मोर्चाचे आयोजन केले होते.
त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सायंकाळी नवलेवाडीतील हुतात्मा स्मारकापासून काढण्यात आलेला विशाल मशाल मोर्चा अकोले पोलिस स्टेशनवर नेण्यात आला. या मशाल मोर्चात सर्व राजकीय पक्ष, वकील संघ, स्वाभीमानी शेतकरी संघटना, वारकरी संघ, प्राथमिक शिक्षक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, रोटरी क्लब, व्यापारी वर्ग, कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, अबाल वृद्ध सहभागी झाले होते. यावेळी शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी रस्त्यावर दुतर्फा वाहतूक जाम झालेली होती.
मोर्चेकरांनी “इन्कलाब जिंदाबाद, संकेतच्या मारेकऱ्याचा शोध लागलाच पाहिजे, शासन झोकात मारेकरी मोकाट, संकेतच्या हत्येची चौकशी झालीच पाहिजे” अशा घोषणा मोर्चा पोलिस ठाण्यावर आल्यानंतर निषेध सभा घेत मधुकरराव नवले, डॉ. अजित नवले, अॅड. वसंतराव मनकर, सदाशिव साबळे, अॅड. शांताराम वाळुंज, मिनानाथ पांडे, सोनालीताई नाईकवाडी, महेश नवले, सुरेश नवले, राजेंद्र सदगीर आदीसह अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी विजय वाकचौरे, विठ्ठलराव चासकर, शंभु नेहे, विक्रम नवले, विलासराव नवले, विकास नवले, आनंदराव नवले, येलुबा नवले, नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, विलास आरोटे, शरद नवले, साईनाथ नवले, डॉ. संदिप कडलग, भाऊसाहेब चासकर, अॅड. सदानंद पोखरकर, दत्ता नवले, स्वाती शेणकर, मंदाबाई नवले, ज्योती गायकर आदी उपस्थित होते. मोर्चेकरांच्या वतीने श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अकोलेचे तहसीलदार सतीश थेटे यांना निवेदन देण्यात आले.

