महाराष्ट्र संवाद न्यूज
नगर येथील यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणात तब्बल 25 महिने आणि 90 सुनावण्या झाल्यानंतर अखेर मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेसह 11 जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. नगर जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या न्यायालयासमोर हा खटला सुरू असून, आजच्या सुनावणीत हे दोषारोपपत्र सिद्ध झाले आहे. दरम्यान, या खटल्यातील एक महिला आरोपी अद्यापि फरार आहे.
मुख्य आरोपी पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे, ज्ञानेश्वर उर्फ गुड्डय़ा शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर चोळके, फिरोज राजू शेख, ऋषिकेश उर्फ तम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, राजशेखर अंजय चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ, महेश वसंतराव तनपुरे, जयंत अकुला चंद्रप्पा, अशी आरोप सिद्ध झालेल्यांची नावे असून, पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ही महिला फरार आहे.
जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबर 2020 रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. घटनेच्या दोन दिवसांनंतर सागर भिंगारदिवे याला पोलिसांनी कोल्हापुरातुन ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पत्रकार बाळ बोठे याने या खुनाची सुपारी दिल्याचे समोर आले होते. भिंगारदिवे याला ताब्यात घेताच बाळ बोठे नगरमधून फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या अधिपत्याखाली वेगवेगळी पथके नियुक्ती केली होती.
बोठे याला अटक केल्यानंतर त्याने सुपारी देऊन हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याला या खटल्यात मुख्य आरोपी करण्यात आले होते. दरम्यान, आपल्याला या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा कांगावा करत बोठे याने जामिनासाठी अर्ज केला होता. या खटल्यात सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना सहायक म्हणून ऍड. सचिन पटेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून बोठेचा जामिन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानेही बोठेचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या खटल्यात एकूण 12 आरोपींचा समावेश आहे. मुख्य आरोपी बोठे याच्याकडून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे आरोपपत्र दाखल करताना पोलिसांना या माहितीची मोठी मदत झाली.
दरम्यान, मुख्य आरोपी बोठे याच्याविरुद्ध कोतवाली तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल झाले असून, त्याचाही तपास सुरू आहे. जरे यांचा मुलगा रुणाल जरे याला धमकवण्याचाही प्रकार झालेला होता. त्यानेही याबाबत पोलिसांकडे अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, गत सुनावणीत ऍड. सचिन पटेकर यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली. ते म्हणाले, गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. या खटल्यातील आरोपी अतिशय सराईत असून, त्यांनी एकमेकांना संपर्क करून हा कट रचला आहे. त्यामुळे यांच्यावर दोषारोपपत्र सिद्ध करावे, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. त्यावर आज सुनावणी ठेवण्यात आली होती. आज झालेल्या सुनावणीत 12 पैकी 11 आरोपींविरोधात आरोपपत्र सिद्ध करण्यात आले आहे. आता नगर जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी नियमितपणे सुरू राहणार आहे.
बोठेचा मोबाईल अजूनही लॉकच
घटनेच्या 102 दिवसानंतर बोठे हैदराबादमध्ये असल्याचा छडा पोलिसांना लागला. नगरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागासह इतर पोलीस पथकाने हैदराबादला जाऊन बोठे याला अटक केली होती. त्याला नगर येथे आणल्यानंतर त्याच्याकडील अन्य माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याचा मोबाईल हस्तगत केला होता. मात्र, तो मोबाईल अद्यापि अनलॉक झालेला नसून, तो तपासणीसाठी लॅबकडे पाठवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे बोठे याला मदत करणाऱ्यांमध्ये नगर आणि हैदराबादमधील 12 जणांचा समावेश आहे. बोठे हैदराबादला असताना नगर येथील त्याचा मित्र महेश तनपुरे याच्याशी संपर्कात होता. तनपुरे हा बोठेच्या घरच्यांच्या संपर्कात असल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागलेले आहेत.
(सौजन्य दैनिक सामना ऑनलाईन)

