महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर : २०२२-२३ या वर्षासाठी जिल्ह्यात विविध कामांकरिता ७५३.५२ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. यातून जिल्ह्यात विविध विकासाची कामे दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण करा तसेच संपूर्ण निधी खर्च होईल, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देत पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक विभागाने प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव येत्या तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यंत्रणांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार मोनिका राजळे, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदी यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्या. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून दरवर्षी यंत्रणांना मागणीनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. २०२३-२४ या वर्षासाठी शासनाने दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिकचा निधी मंजूर करण्यासाठी वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत अधिकच्या निधीची आग्रही मागणी करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. जिल्ह्यात अनेक धार्मिकस्थळे व साहस पर्यटनाची स्थळे असुन या ठिकाणी राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. साहस व धार्मिक पर्यटनाला अधिक प्रमाणात चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी या दोनही पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येईल. 
जिल्ह्यातील भंडारदरा हे अत्यंत प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. समृद्धी महामार्गामुळे अत्यंत कमी वेळात मुंबईपासुन भंडारदरापर्यंत सर्वसामान्यांना पोहोचता येणे शक्य होणार असल्याने येणा-या काळात या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाचे नुतणीकरणाबरोबरच इतर विकासकामे हाती घेण्याच्या सुचना केल्या.
जिल्ह्यातील रोजगार निर्मितीमध्ये अधिक प्रमाणात वाढ होऊन बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आयटी पार्क उभारणीसाठी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती तसेच शासकीय जमिनी उपलब्धतेचा आढावा घेण्यात यावा. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी परदेशासह विविध राज्यात अनेक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. या विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करण्याबाबत या विद्यार्थ्यांची परिषद करा.
रोहित्रे उपलब्ध नसल्याने तसेच ती नादुरुस्त असल्या कारणाने अनेकवेळा ग्रामीण भागातील जनतेला वीज पुरवठा करताना अडचणी येतात. जनतेला योग्य दाबाने व विनाखंडीत वीज पुरवठ्यासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय रोहित्रांची बॅंक उभारण्यात यावी. यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा.
कोविड काळात तसेच एस.टी महामंडळाच्या संपामुळे जिल्ह्यात अनेक मार्गावरच्या बसेसच्या फेऱ्या बंद झालेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींना प्राधान्य देत उपलब्ध असलेल्या बसेसच्या फेऱ्याच्या सुरळीतपणे नियोजन करण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

