संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज:
ग्राम विकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी १० कोटी ५० लाख १४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे.
महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विकासकामांचा धडाका सुरू असून यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, तालुक्यात रस्त्यांचे आणि पुलांचे जाळे निर्माण करून सर्वांगीण विकास साधण्याचा मानस आमदार खताळ यांनी यावेळी व्यक्त केला.
या निधीतून चंदनापुरी ते शिरापूर दरम्यानच्या पुलाच्या बांधकामासाठी ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तर पिंपरणे ते घोडेझाप (कोलवाड) येथील ५० मीटर लांबीच्या पुलासाठी ७ कोटी २५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संगमनेर तालुक्यातील या दोन्ही महत्त्वाच्या कामांसाठी ग्राम विकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या दृष्टीने हे दोन्ही पूल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत असत, त्यामुळे अनेक वर्षांपासून या पुलांची मागणी होत होती. आमदार अमोल खताळ यांनी राज्य शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी पदरात पडला आहे. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत. 







