महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर : पोस्टर फाडण्याचा राग मनात धरून राजकीय वर्चस्व वादातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघा तरुणांची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर उर्वरित 13 आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची साडेचार वर्षांपूर्वी २८ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळच्या वेळी बीड रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
राजकीय वर्चस्ववादातून झालेल्या या दुहेरी हत्याकांड प्रकरणी तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी तपास करत गोविंद दत्तात्रय गायकवाड, विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काका बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमारिया रमिश, अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव व धनाजी धनराज जाधव या 14 जणांविरोधात श्रीगोंदा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्याचे गांभीर्य लक्षात घेत राज्य शासनाकडून विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली होती. श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. एन. शुक्ला यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. खटल्यात सरकार पक्षाने प्रत्यक्षदर्शी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह बत्तीस साक्षीदारांची तपासणी केली. तर बचाव पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी न्यायाधीश जी. एन. शुक्ला यांनी खटल्याचा निकाल जाहीर केला.
मुख्य आरोपी स्वामी उर्फ गोविंद दत्तात्रेय गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काकासाहेब बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमरिया रविश, अशोक जाधव, पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिनंदन जाधव व धनाजी धनराज जाधव या तेरा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

