पालिका, महापालिकेच्या निवडणुकीला मुहूर्त कधी लाभणार?
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मुंबई : नाशिक, अमरावती या दोन पदवीधर मतदार संघासोबत औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने त्या संबंधीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असली तरी बहुचर्चित ठरलेल्या पालिका आणि महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप आयोगाला मुहूर्त सापडलेला नाही.
गेल्या तीन टर्मपासून आमदार डॉ. सुधीर तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत सक्षमपणे प्रतिनिधित्व करत आहे. दोन दिवसापूर्वीच त्यांची विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून निवड झाली होती. तांबे यांच्यासह अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजीत पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षक मतदार संघामध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक वर्चस्वाची व महत्त्वाची ठरणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हे नाशिकमधून काँग्रेसचे आमदार आहेत. होऊ घातलेल्या निवडणुकीतही त्यांची उमेदवारी निश्चित असून काँग्रेससाठी ही जागा महत्त्वाची आहे. तर दोन वर्षांपूर्वी पदवीधर मतदार संघातून विजय मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी औरंगाबादची जागा महत्त्वाची मानली जाते. औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे.
तर अमरावती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने डॉ. रणजीत पाटील यांची उमेदवारी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जाहीर केली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी ही जागा प्रतिष्ठेची असेल. याशिवाय कोकण आणि नागपूरमध्ये अपक्ष उमेदवार प्रतिनिधित्व करत असल्याने याही जागांवर निवडणूक होत असून येथे कोणाची वर्णी लागणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
पदवीधर सह शिक्षक मतदार संघासाठी ५ जानेवारीला अधिसूचना निघणार असून १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १३ जानेवारीला उमेदवारी अर्जाची छाननी होईल. १६ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. तर ३० जानेवारीला पाचही जागांसाठी एकाच वेळी मतदान होणार असून २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान निवडणुकीची घोषणा झाल्याने आचारसंहिता देखील लागू झाली आहे.

