महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : मन स्वास्थ्यासाठी योग व प्राणायाम अतिशय महत्त्वाचा आहे. योगमित्र डॉ. सुधाकर पेटकर गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने न थकता योगा व प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून तरुणांना लाजवतील असे महान कार्य करत असल्याचे गौरवोद्गार नासिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.
संगमनेरमधील भंडारी मंगल कार्यालयात २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था, योगवर्धिनी, आधार फाउंडेश, संगमनेर साहित्य परिषद, रोटरी क्लब, निमा आणि महेश ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या योग व प्राणायाम शिबिराच्या रोप्यमहोत्सवी समारोपावेळी आमदार सुधीर तांबे बोलत होते. यावेळी सेवाभावी क्षेत्रात काम करणारे ऋषिकेश मोंढे, प्रदीपभाई शहा, गणेश बाहेती, डॉ. विनायक नागरे, सुरेश जाजू, ज्ञानेश्वर राक्षे, अरविंद गाडेकर, प्रा. अलका पेटकर आदी यावेळी उपस्थित होते.
तांबे म्हणाले, योग प्रशिक्षणाचे पेटकर करत असलेले काम अनुकरणीय आणि प्रशंसनीय आहे. आम्ही लोक नवीन वर्षात संकल्प करतो मात्र त्यामध्ये कामाच्या व्यापामुळे सातत्य राहत नाही. ते सातत्य ठेवण्याचा आग्रह सगळीकडून होत असतो.
डॉ. नागरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना योगासोबतच दैनंदिन आहाराचे महत्व विशद केले. तर डॉ. पेटकर यांनी योगाभ्यासातील त्यांचे पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळाचे अनुभव उपस्थितांसमोर विशद करत शरीर आणि मन यांचा योगाशी असलेला मौलिक संबंध स्पष्ट करीत नव्या वर्षात योग प्राणायाम नियमित करण्याची शपथ उपस्थितांना दिली.
२६ ते ३१ डिसेंबर दरम्यान भंडारी मंगल कार्यालयात दररोज सकाळी एक तास हे शिबिर सुरू होते. शिबिरामध्ये अनेक शिबिरार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित शिबिराथीपैकी अनिल सोमणी व वैशाली कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक ज्ञानेश्वर राक्षे यांनी, सूत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी केले तर प्रा. अलका पेटकर यांनी आभार मानले.

