महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील दोघा वाळू तस्करांना संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकणे (रा. धांदरफळ खुर्द ता. संगमनेर) आणि अरबाज करीम शेख (रा. जोर्वे रोड, संगमनेर) अशी या दोघा वाळूतस्करांची नावे आहेत. सातत्याने वाळू तस्करी करताना आढळल्याने संगमनेर शहर पोलिसांनी पोलीस उपाधीक्षकांमार्फत हे प्रस्ताव प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांच्याकडे कारवाईसाठी पाठविले होते.
प्रांत अधिकाऱ्यांसमोर यासंदर्भातील सुनावणी झाल्यानंतर त्यांनी संबंधित दोन्ही वाळू तस्करांना एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
राज्याचे महसूल मंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेल्यानंतर जिल्ह्यात वाळू तस्करीला लगाम घालण्यासाठी प्रशासनाने पावले उचलले आहेत. सातत्याने होणाऱ्या वाळू तस्करीच्या आणि त्यातून घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे यांनी गौण खनिज धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात यासंबंधीचे नवे आदेश प्रशासनाला प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. वाळू तस्करी मध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने जिल्ह्यात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होताना दिसते. यातूनच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे देखील प्रकार घडले आहेत.
दोघा वाळू तस्करांच्या हद्दपारीनंतर तालुक्यातील अन्य गौण खनिज तस्करांच्यावर कठोर कारवाईची मागणी जनतेतून होत आहे.


