महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : भूमिगत गटार योजनेच्या चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या कामामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर गंगामाई घाटाकडे जाणारा पूल खचल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा पूल वाहतुकीस बंद आहे. या पुलाची दुरुस्ती तातडीने होणे शक्य नसल्याने जवळच कमी उंचीचा कॉजवे पूल दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी संगमनेर भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेत गणपुले यांनी ही मागणी केली आहे. स्वामी समर्थ मंदिरालगत असलेला हा पूल तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी नाबार्ड अर्थसहाय्य योजनेतून मिळविलेल्या निधीतून या पुलाची उभारणी करण्यात आली होती. सुस्थितीत असलेल्या या पूलाचे तीन गाळे खचल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. स्वामी समर्थ मंदिरालगतच्या या पुलावरून साईबाबा मंदिर, गंगामाई घाट, साईनगर, पंपिंग स्टेशन या उपनगरातील रहिवाशांना ये-जा करता येत होती. शिवाय या परिसरात पुलापलीकडे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय असून पूल बंद असल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठी गैरसोय झाली आहे. या परिसरात असलेली मंदिरे वृक्षराजी यामुळे सकाळी व संध्याकाळी वृद्धांसह सर्व स्तरातील नागरिक फिरण्यासाठी, शुद्ध हवेसाठी येत होते. पूल बंद असल्याने या सर्वांची अडचण झाली.
परिसरातील जवळपास दहा हजार लोकसंख्येसाठी शहरात येण्याचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. या पुलाखालून करण्यात आलेल्या भूमिगत गटार योजनेच्या चुकीच्या कामामुळे सुस्थितीत असलेला हा पूल खचला आहे. संगमनेर नगर परिषदेत सध्या प्रशासक राज सुरू आहे. कौन्सिल अस्तित्वात नसल्याने या पुलाच्या बांधकामासाठी कोणी प्रयत्नशील दिसत नाही. तसेच या पुलाच्या बांधकामासाठी निधीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर पूल तातडीने दुरुस्त होणे शक्य नसल्याची चिन्हे आहेत.
त्यामुळे तेवढयाच वेळात पर्यायी कमी उंचीचा कॉजवे पुल हा चव्हाणपुरा ते घोडेकर मळा, वेताळ बाबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधला तर तो लवकर पूर्ण होऊन अडचण दुर होणार आहे.
यासंदर्भात आपल्याशी झालेल्या चर्चेनंतर या पुलाच्या निर्मितीसाठी दोन कोटी आठ लाख चाळीस हजार रुपयांचे अपेक्षित अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहे. यासाठी तातडीने निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे या पुलाच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालकमंत्री या नात्याने लक्ष घालण्याची मागणी गणपुले यांनी केली आहे.
याकरिता आवश्यक त्या योग्य योजनेतून निधी उपलब्ध करुन दिल्यास चालू वर्षातच सदर पुलाचे बांधकाम सुरु होऊन नागरिकांची गैरसोय दूर होऊ शकते असे या निवेदनात म्हटले आहे. पूल निर्मितीचे गाऱ्हाणे थेट महसूल मंत्र्यांच्या दरबारी गेल्याने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतात, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.


