महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शुक्रवारी मध्यरात्री तीन बिबट्यांनी एकत्रित पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घालत सुमारे चारशेहून अधिक कोंबड्या फस्त केल्या तर अनेक कोंबड्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.
अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथील शेतकरी सुधीर दगडू बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ही घटना घडली आहे. अनेक कोंबड्या भयभीत झाल्याने आणखी काही कोंबड्या दगावण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील मेहेंदुरी परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचा या परिसरात नेहमीच वावर असतो. बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून हा भाग परिचित आहे. त्यामुळे या परिसरात अनेक बिबटे दिवस-रात्र संचार करीत आहेत. यातून मानवांवर हल्ल्याचे प्रकार देखील घडले आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये एकाच वेळी तब्बल तीन बिबटे घुसले. या बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात कोंबड्या असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घालत शेकडो कोंबड्यांना आपले भक्ष्य बनविले. यामध्ये अनेक कोंबड्यांना जखमी केले. बिबट्यांच्या या हल्ल्यात सुमारे ४०० कोंबड्या दगावल्या आहेत. दरम्यान पोल्ट्री फार्मचे मालक बंगाळ यांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आपल्या फार्ममध्ये बिबटे घुसल्याची शंका आल्याने त्यांनी पोल्ट्री जवळ जाऊन पाहिले असता कोंबड्यांचा फारसा पाडलेले बिबटे त्यांना बघून पोल्ट्रीच्या कुंपणावरून उडी मारत जवळच्या उसाच्या शेतात गायब झाले.
शनिवारी सकाळी अकोले वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विठ्ठल पारधी यांनी घटनास्थळी जाऊन मृत आणि जखमी कोंबड्यांचा पंचनामा केला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात बंगाळ यांचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या सर्व मृत कोंबड्या मोठा खड्डा खोदून गाडून टाकण्यात आल्या. अकोले तालुक्यात बिबट्यांचा मोठा उपद्रव वाढला असून वनविभागाने याठिकाणी पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थानी केली आहे.

