महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर ; कोरोना काळात जिल्हा बंदी असताना नासिकहून पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनाची तपासणी करताना नाकाबंदी दरम्यान दंड आणि कारवाई चुकविण्याचे उद्देशाने पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलीस निरीक्षकांच्या पायावर कार घालून त्यांच्या पायाला दुखापत करणाऱ्या आरोपीची संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांनी अवघ्या ११ महिन्यात हा खटला निकाली काढला. १५ मे २०२१ रोजी संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील आंबी फाट्यावर हा प्रकार घडला होता. कोरोना प्रादुर्भाव असल्याने नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना पास आहेत की नाही याची पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपासणी करत होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी इर्टिगा कार नाशिकवरून पुण्याकडे नेत असताना पोलीस निरीक्षक पाटील यांनी ती तपासणीसाठी थांबविली. मात्र नाकाबंदी दरम्यान दंड आणि कारवाई चुकविण्याच्या उद्देशाने पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपीने कार पाटील यांच्या पायावर घातल्याने त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. यामुळे पाटील यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात दुखापत करणे व शासकीय कामात अडथळा केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत यांनी तपास करत आरोपीस अटक केली होती. तसेच आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपीने न्यायालयामध्ये गुन्हा नाकबूल करत केसमध्ये खोट्या रीतीने गोवल्याच सांगत खटला चालविण्याची विनंती केली. न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती.
न्यायालयासमोर सरकार पक्षाला आरोपीविरुद्ध ठेवलेला कोणताही आरोप सिद्ध करता आला नाही. तसेच निरीक्षक पाटील यांनी न्यायालयासमोर नजरचुकीने गाडी बाजूला घेताना धक्का लागल्याचे कबूल केले. त्यामुळे आरोपीने शासकीय कामात अडथळा आणल्याचे शाबित करता आले नाही.
तसेच आरोपीची वाहतूक अत्यावश्यक सेवेत येत असल्याने त्याला संबंधित प्रतिबंधात्मक आदेशातून सूट असल्याचा केलेला बचाव न्यायालयाने मान्य करत आरोपीला संशयाचा फायदा देत गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले आहे. आरोपीच्या वतीने ॲड. अतुल आंधळे यांनी काम बघितले.

