महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मुंबई / नाशिक : ‘राजा का बेटा राजा नही बनेगा जो काबिल है वही राजा बनेगा’, असं म्हणत शुभांगी पाटील यांनी नासिक पदवीधर निवडणुकीत रणशिंग फुंकले आहेत. आधी भाजपकडून इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांनी आता शिवसेनेकडून (ठाकरे गट) पाठिंबा मिळविण्यात यश मिळविले आहे. यामुळे सत्यजित तांबे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा शिवसेनेला (ठाकरे गट) देण्यात आली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. उलट चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत मोठा चमत्कार घडवून आणला होता.
डॉ. तांबे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तसाच भारतीय जनता पक्षानेही या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांची उमेदवारी बंडखोरी समजून ते भाजपचे उमेदवार असल्याचा प्रचार सुरू आहे.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात मोठा पेच निर्माण झाल्याने मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपवासी झालेल्या पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र पक्षाने त्यांनाही एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे निवडणुकीतील ट्विस्ट लक्षात घेत भाजपचा पाठिंबा तांबे यांना मिळणार हे गृहीत धरून पाटील यांनी मातोश्रीची वाट धरली.
दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील बंडखोर तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. येत्या दोन दिवसात ते भूमिका स्पष्ट करण्याच चिन्ह असून तोपर्यंत पदवीधर निवडणुकीतील सस्पेन्स कायम राहणार आहे.
फडणवीस म्हणाले… योग्य वेळी योग्य गोष्टीचा खुलासा करू
सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले योग्य वेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू. बघत रहा, परिस्थितीवर नजर ठेवा. योग्य वेळी योग्य गोष्टी आपल्याला समजतील.

