महाराष्ट्र संवाद न्यूज # वाढदिवस विशेष
संगमनेर तालुक्यातील जोर्वे माझे माहेर. गावातील थोरात कुटुंबाला मोठी प्रतिष्ठा. गावची पाटीलकी. आजोबा संतुजी पाटील पुरोगामी विचारांचे इंग्रजी मेट्रीक झालेले. जातपात न पाळणारे. वाचनाची आवड. वडील भाऊसाहेब थोरात व आई मथुराबाई यांची मी सर्वात धाकटी मुलगी. नाजूक उंचीने जरा कमी, घरात सामाजिक वातावरण, पाहुणे, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, माझी आई सर्वांची विचारपूस करायची. चहा, जेवण, मुक्कामी कार्यकर्त्यांच्या अंथरूण, पांघरुणाची सोय लावली की नाही. हे ती स्वत: पाहायची. त्यांच्या कृतीतून आम्ही भांवड घडत गेलो.
शिक्षण पूर्ण झाले आणि माझ्यासाठी स्थळ सूचविली जावू लागली. माझे आतेभाऊ अनिल अण्णासाहेब शिंदे यांनी डॉ. सुधीर तांबे यांना सेट लूक हॉस्पीटलला इंटर्नशिप करतांना बघितले होते. त्यांनी माझे बंधू बाळासाहेब यांना सांगितले. डॉ. तांबे फार चांगले आहे. कष्टाळू आहेत. दुर्गासाठी बघा. डॉ. तांबे स्थळ बघायला आले. ते एमएस करत होते. मी रहायला साधी. कपाळाला कूंकू, हातात बांगड्या, लांब केसाची एक मोठी वेणी. त्यांनी त्याआधी खूप मुली पाहिल्या होत्या. पण त्यांना साधी राहणारी मुलगी पाहिजे होती. त्यांना मी पसंद पडले. मात्र गडबडीत उंची विचारायचं विसरुन गेलो. अस ते आजही म्हणतात.
अस्स सासर सुरेख बाई
तांबे परिवार तेव्हाच्या श्रीरामपुर तालुक्यातील दाढ बुद्रुकचा. माझे सासरे भास्करराव तांबे (अण्णा) कर्मवीर भाऊराव पाटील यांना रयत शिक्षण संस्थेच्या कामात मदत करायचे. त्यामुळे ते त्या भागात भिका मास्तर म्हणून प्रसिध्द होते. माझ्या सासूबाई प्रयागाबाई त्या काळातील सातवी शिकलेल्या सासरे नंतर ग्रामसेवक झाले. नोकरीनिमित्त त्यांचे खूप फिरणे झाले. मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंब संगमनेरला हलवलं. पुढील शिक्षणासाठी मुलांना पुण्यात पाठवलं. डॉ. तांबे पहिल्यापासून अतिशय अभ्यासू, शिस्तीचे. त्यांनी एमबीबीएसला प्रवेश मिळविला. संपूर्ण शिक्षण स्कॉलरशिपवरच झाले. उलट उरलेले पैसे ते घरी वडीलांना मनी ऑर्डरने पाठवत. ग्रामसेवकाच्या नोकरीत खोटेनाटे पटले नाही. म्हणून तडकाफडकी राजीनामा देवून अण्णा घरी आले.
मग त्यांनी उत्कृष्ट शेती केली. एकरी 110 टन ऊस काढला. त्यात त्यांनी अनेक बक्षीस मिळविली. अशा सुशिक्षीत परंतू शेतकरी कुटुंबात मी आले. डॉक्टरसाहेब त्यावेळी एमएसच्या पहिल्या वर्षाला होते. मी दाढला सासू सासर्यांसोबत राहत होते. सासूबाई खूप प्रेमळ. मी आयुष्यात एकही उपास केलेला नाही. वडिलांच्या पुरोगामी विचारसरणीत वाढलेली. सासूबाईंनीही उपवास कर असा कधीही आग्रह केला नाही.
डॉक्टरांना लहानपणापासून सामाजिक कार्याची खूप आवड. चौथीत असताना भारत पाकिस्तान युध्द सुरु झालं. पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी जनतेला आवाहन केलं की, भारताला तातडीने नॅट विमान खरेदी करायचे आहे. त्याची किमत 25 लाख रुपये होती. या सर्व बारक्या मित्रांनी एक डबा तयार केला व बाजारात फिरुन 27 रुपये आणि काही पैसे जमा केले. बीजे मेडिकलला असताना त्यांनी व नगरच्या डॉ. सुभाष म्हस्के यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी निधी गोळा करुन मदत केली. अशा सामाजिक कार्याची त्यांना पहिल्यापासून आवड. विवाहाच्या वेळी त्यांनी अनेक गोष्टी टाळल्या. कारण त्यांचीही विचारसरणी पुरोगामीच. मात्र खंडोबाच्या दर्शनाला गेल्यावर मला पाच पायर्या उचलून घ्यायला विसरले नाहीत.
संगमनेरला प्रॅक्टीस करायला आल्यावर भाऊंच्या मदतीने जागा शोधली. गरजूंना ताबडतोब मदत करणे हा त्यांचा स्वभावच. पेशंटला 10-20 रुपये कसे मागायचे? ते त्यांना पटेना. कुणी आग्रहाने फी देऊन जात. पेशंटला औषधाला पैसे नाहीत कळले. की ते लगेच देत त्यांची वृत्ती खूपच कष्टाळू गरज खूप कमी. ते दोन-दोन दिवस, रात्रंदिवस हॉस्पीटललाच झोपत. ऑपरेशन करत. ते निष्णात सर्जन. त्यांचे जिवलग मित्र डॉ. देवेंद्र ओहरा यांचं घर जवळच असल्याने घरी घेऊन जात खूप काळजी घेत.
भाजी भाकरीच आवडते
साहेबांच्या फार आवडी नाहीत. साधी भाजी भाकरी हा त्यांचा आहार आहे. मी आजारी असतांना त्यांनी माझी फार काळजी घेतली. त्यावेळी दादांचा जयंती महोत्सव होता. ही जबाबदारी त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर सोपवून दिली होती. त्यांनी मला वेळोवेळी महिला बचतगटांसाठी काम करायला सूचविल. मी तालुक्यात अनेक गावांमध्ये अन्य महिला कार्यकर्त्यांसोबत जाते. महिलांपूढे भाषण करते. स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधात मी साहेबांच्या मार्गदर्शनाने अनेक ठिकाणी जाऊन भाषणे केली. महिलांनी त्याला भरभरुन दाद दिली. दादांनी दंडकारण्य चळवळ सुरु केली. पुरुषांबरोबरच महिलाही चांगल्या पध्दतीने काम करु शकतात. हे तालुक्यातील महिलांनी झाडे लावून दाखवून सिध्द केले. याकामी मी वेळोवेळी महिलांसोबत होते. निरोगी समाज निर्मितीसाठी सर्वांचाच पुढाकार महत्वाचा आहे. त्याचाच एक भाग म्हणजे दंडकारण्य चळवळ महिलांनी अंधश्रध्दांना बळी न पडता समाजकार्य केले पाहिजे. विज्ञानवादी विचारांची कास धरली पाहिजे. स्त्रिया असाध्य आजाराला बळी पडतात. त्याचे कारणच यामध्ये दडलेले असते. व्रत वैकल्याच्या अतिआहारी न जाता महिलांनी पोटभर जेवण केले पाहिजे. तरच त्यांना सक्षमपणे समाजकार्य करायला ताकद मिळेल. स्वतला निरोगी ठेवण्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. हे मी कार्यक्रमांमधून सांगत असते. यासाठी मला साहेबांचे मार्गदर्शन असते.
कल्याण झाले माझे
हॉस्पीटलला रोजच्या रोज जाऊन राऊंड घेणे, हा डॉक्टरसाहेबांचा नियम आहे. पेशंटला बारीक तपासणार. लगेच सहायकाला अचूक सांगणार. हजारो पेशंटची त्यांच्यावर खूप श्रध्दा आहे. डॉक्टरांना बघूनच काही बरे होतात डॉ. तांबे खरोखर एक सर्जन व्यक्तिमत्व आहे. मला नेहमी म्हणणार, ऐक माझे कल्याण होईल तुझे. डॉक्टर मिळण्यासाठी मी हरतालिकेसारख कसंल व्रत, काहीही उपासतापास केले नाहीत. परमेश्वराने मात्र मला बुध्दीमान, सज्जन, प्रेमळ पती दिला. म्हणून मी त्यांचे आभार मानते. डॉक्टरी पेशाबरोबरच त्यांना शेतीची खूपच आवड. ते उपजतच शेतकरी असल्याने एक प्रयोगशील शेतकरी. आधी गुलाबाची शेती केली. लोक फुल नेत, कुणी सार्वजनिक कार्यक्रमासाठी, पण पैसे मागायचे कसे ? सर्वच नातेवाईक, कार्यकर्ते, मित्र मग बंदिस्त शेळीपालन केले. डाळिंब शेतीनंतर कुक्कटपालन. परत आता डाळिंब शेती. काही ना काही करीतच राहतात. यातूनच 1985 मध्ये छोटीशी ब्राउन पेपर मिल सुरु केली. अशी खूप उद्योगशीलता, नवीन नवीन संकल्पना सतत विचारात असतात.
… आणि श्रीयुत विसरभोळे
डॉक्टरांना कामाचा कधी विसर पडत नाही. मला मात्र विसरुन जातात. कार्यक्रमाला जायचे असेल मी आवरुन तयार असले तर कार्यक्रमात पोचल्यावर त्यांना ते आठवते. सर्वांचे वाढदिवस आठवतील. माझा व आमच्या लग्नाचा वाढदिवस मात्र पूर्ण विसरणार ते नगराध्यक्ष असताना आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी संध्याकाळी पूरण पोळी केली. छान साडी नेसून तयार झाले. रात्रीचे दहा वाजले. तरी ते घरी आले नाहीत. उशिरा आले. मी म्हणाले, चला आता जेवण करायला पुरणपोळी केली आहे. ते म्हणाले, आज काय विशेष! मला भूक नाही. आम्ही नगरसेवकांनी भेळ खाल्ली. मग पूर्ण स्थिर होऊन उभी राहिले.म्हटल. अहो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे.
दुर्गाताई तांबे, माजी नगराध्यक्ष, संगमनेर.

