महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर / संगमनेर : नगर जिल्ह्यातील चार शिक्षकांसह दोघा केंद्र प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात संगमनेर तालुक्यातील दोन शिक्षकांचा समावेश असून त्यांनी आपल्या जागेवर परस्पर डमी बेरोजगार शिक्षकांच्या नियुक्ती केल्याचे, तसेच कामात हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या सर्वांवर निलंबनाची कारवाई केली.
सीईओ येरेकर यांनी यासंबंधीचे आदेश मंगळवारी काढले आहेत. या शिक्षकांच्या धक्कादायक करामती यामुळे समोर आल्या आहेत.
यांच्यावर झाली कारवाई
उपाध्यापक रमेश शिवाजी आहेर (कारेवाडी, संगमनेर), प्रभाकर सखाराम रोकडे (जवळे बाळेश्वर संगमनेर), उपाध्यापक मदन रंगनाथ दिवे (राहुरी), पारनेरचे केंद्रप्रमुख अविनाश गुलाबराव गांगर्डे, उपाध्यापक बाजीराव शंकर पानमंद (जि.प. शाळा मांजरधाव, हिवरे कोरडा, पारनेर) व मुख्याध्यापक पोपट दगडू फाफाळे (पाडळी दर्या, पारनेर)
संगमनेर तालुक्यातील कारेगाव येथील झेडपीच्या शाळेतील शिक्षक रमेश शिवाजी आहेर याने आपल्या जागेवर परस्पर कमी रोजगार शिक्षकाची नेमणूक करून त्याच्याकडून अध्यापन करून घेतले जात असल्याची तक्रार सीईओ येरेकर यांच्याकडे करण्यात आली होती. येरेकर यांनी गुप्तपणे याबाबत खात्री केली असता आहेर याच्या विरोधातील तक्रार खरी असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे निलंबन करून त्याला जामखेड मुख्यालय देण्यात आले आहे. याशिवाय संगमनेर तालुक्यातील जवळ बाळेश्वर शाळेचे प्रभाकर सखाराम रोकडे यांचे देखील निलंबन करण्यात आले.
स्वतःच्या जागेवर त्यांनी शिक्षक नेमणाऱ्या पारनेरमधील एकाला सेवेतून कमी करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करत असलेल्या बाजीराव पानमंद या शिक्षकाने स्वतःची पतसंस्था स्थापन केली. शिवाय, पतसंस्थेत नेमणूक असलेल्या कुलदीप जाधव या कर्मचाऱ्यांची आपल्या जागेवर शिक्षक म्हणून अनधिकृत नेमणूक केली.
त्याचा पगारही पतसंस्थेमार्फतच काढला. अनेक तक्रारीनंतर देखील शिक्षण विभागासह संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र एका ग्रामस्थांच्या तक्रारीवरून पारनेर पोलिसांच्या चौकशीत ही बाब समोर आली. पानमंद है गोरेगाव येथील गोरेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. गेल्या सात वर्षांपासून पानमंद यांच्या सांगण्यावरून शाळेत अध्यापन करीत असल्याचा लेखी जवाब या डमी शिक्षकाने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्याकडे दिला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यावर प्रशासकाची जबाबदारी आहे. त्यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

