महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी प्रचारात वेग घेतला असतानाच एकापाठोपाठ एक शिक्षक संघटना त्यांना पाठिंबा देत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
काँग्रेस नेते आमदार सुधीर तांबे, सत्यजीत तांबे आणि कपिल पाटील यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिला. यापूर्वी तांबे यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
नाशिक विभागातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून सुधीर तांबे यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते म्हणाले की, मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन निवडणुका लढवल्या. तीनही निवडणूक लढवत असताना सगळ्यांनी खूप चांगला पाठिंबा दिला. पहिल्या वेळेस मला पक्षाचा पाठिंबा नव्हता. म्हणजे मी अपक्ष होतो. पण सर्व शिक्षकांनी मला मनापासून पाठिंबा दिला होता. माझ्या मनात शिक्षकांबद्दल सदैव कृतज्ञतेची भावना आहे. मला शिक्षक भारती संघटनेने सहकार्य केलं. त्यामुळे यापुढे या मतदारसंघात शिक्षकांच्या हक्कासाठी एक आजी आणि एक माजी असे दोन आमदार असतील.
सामान्य माणसाचं शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षणाची महत्त्वकांक्षा शिक्षकांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. शिक्षकांना पेन्शन योजना मिळाली पाहिजे. शिक्षकांचे सर्व प्रश्न सुटायला हवेत. कपिल पाटील यांनी औरंगाबादला मोठा मोर्चा काढला होता. तेव्हा मी तिथे सुद्धा उपस्थित होतो. मी काही दिवसांनी माजी आमदार होणार आहे. पण माजी आमदार म्हणूनही काम करता येईल. शिक्षकांच्या हक्कासाठी दोन आमदार आमच्या परिवारातील राहतील. पुरोगामी विचारांशी आमची बांधिलकी कायम राहील, असंही सुधीर तांबे म्हणाले.
शिक्षक भारती मदतीला आली हे मी कदापिही विसरू शकणार नाही
या राज्यातील असा एकही तालुका नाही जिथे मी काँग्रेसचं काम केलेलं नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत मी काम केलंय. मित्र जमवण्याचं काम केलं. अनेक राजकीय संस्था आणि संघटनांवर मी काम करतोय. म्हणूनच कपिल पाटील यांच्या मनामध्ये गेली अनेक वर्ष होतं, खरंतर कपिल पाटील माझ्यासाठी विधानसभेचा मतदारसंघ शोधत होते. “ज्यावेळी आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं, तेव्हा कपिल पाटलांनी आम्हाला स्वतः फोन करून पाठिंबा दिला. अशा काळात कपिल पाटील आणि शिक्षक भारती आमच्या मदतीला धावून आली. हे मी कदापि विसरू शकणार नाही.” असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं.

