महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पुणे : आज माध्यमांमध्ये हिंसक बातम्यांना मोठ्या प्रमाणात स्थान मिळते. सध्याच्या स्थितीमध्ये नकारात्मकता वाढविणाऱ्या अनेक घटना समोर येत आहे. अशा स्थितीत प्राण वाचविणाऱ्या बातम्यांना माध्यमांमध्ये स्थान मिळत नसल्याची खंत व्यक्त करत अशावेळी लेखकांनी साहित्यामधून सकारात्मकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी माहिती आयुक्त व जेष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी केले.
चपराक प्रकाशनच्यावतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कुवळेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी न्यायाधीश सुनील वेदपाठक, पुस्तक प्रकाशन घनश्याम पाटील, पत्रकार निसार शेख, संदीप वाकचौरे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, मनोहर इनामदार, चंद्रलेखा बेलसरे आदी उपस्थित होते.
कुवळेकर म्हणाले, हल्ली चांगल्या गोष्टी खऱ्या आहेत याबद्दल शंका येते, असा काळ आहे. माध्यमातून चांगले येत नाही. आपल्या भोवतालमध्ये नैराश्य असते तेव्हा लेखकांनी आशेचा किरण दाखवणे महत्त्वाचे आहे. ध्येयवृत्तीने काम महत्त्वाचे असून चांगले साहित्य रसिकांपर्यंत पोहचवणे महत्त्वाचे आहे. संदर्भ सोडून सांगितले जाते तेव्हा सत्य नाही हे लक्षात घ्यायला हवे. शिकण्याची वृत्ती असल्यास भोवतालमध्ये शिकण्यासारखे खूप काही आहे.
शिक्षणाशिवाय जगात परिवर्तन होऊ शकत नाही. मात्र शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकात असते तेवढे नाही. त्या पलीकडे देखील शिक्षण असते हे लक्षात घेण्याची गरज आहे. समाजामध्ये शहाणपण कमी होत आहे. शिकलेल्या माणसांमध्ये शहाणपण आहे असे वाटते, पण त्यापेक्षा अडाणी माणसांमध्ये सुद्धा अधिक शहाणपण असल्याचे दिसते. अडाणी माणसं शहाणी आहेत. समाजामध्ये ऐकण्याची सवय वृद्धिंगत करण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये शिकण्याची संधी आहे. आपण त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे अधिक महत्त्वाचे आहे.
साहित्य माणसाला जगण्यासाठी दृष्टी देते. घनश्याम पाटील विक्रमवीर आहेत. एकाच वेळेस अनेक पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा सोहळा करणे हे लिहित्या हाताना बळ देणारे आहे.
न्यायाधीश सुनील वेदपाठक म्हणाले, मनामध्ये प्रत्येकजन संघर्ष करत असतो. त्याचं स्वरूप भिन्न असतं पण असे संघर्ष समजावून घेणे, त्याचवेळी त्यामध्ये असलेल्या चांगल्या माणसांची व्यक्तिचित्रे वाचणे या गोष्टीही मनाला आनंद देणाऱ्या आहेत. ‘पाटी पेन्सिल’ हे पुस्तक शिक्षणाचा व्यापक पट उलगडून दाखविणारे आहे. शिक्षण घेत असताना आपण जीवन जगत नाही. जीवन जगत असताना शिक्षण घेतले. हे चित्र बदलण्याची गरज आहे. शिक्षणाचा विचार महत्त्वाचा आहे. केवळ साक्षरतेपेक्षाही शिक्षणातून उत्तम नागरिक हवा, ही भूमिका महत्त्वाची आहे. साक्षरतेचा विचार नको, शहाणपण हवे, असे ते म्हणाले.
घनश्याम पाटील यांनी पुस्तकांविषयी विवेचन करून प्रास्तविक केले. लेखकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव गिर यांनी केले. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते आबा बागुल, नामवंत विधिज्ञ प्रताप परदेशी, रामदास नेहूलकर, प्रकाश रेणुसे, रवींद्र कामठे, अरुण कमळापूरकर, विद्याधर शुक्ल, पोपट काळे, प्रवीण शिरसाट, अजय रावत, अरुण जाधव, ज्ञानेश्वर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्तंभ लेखक संदीप वाकचौरे यांचे ‘पाटी पेन्सिल’, चंद्रलेखा बेलसरे यांचे ‘पाठलाग’, नाशिर शेख यांचे ‘इस्लाम खतरे मे है’, रवींद्र खंदारे यांचे ‘संघर्ष हेच जीवन’, मनोहर इनामदार यांचे ‘गवसनी’ या पाच पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

