महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या सत्यजित तांबे यांनी काँग्रेसने विश्वासाने दिलेला एबी फॉर्म गद्दारी करत खिशात घातला. आधी त्यांनी काँग्रेसला मामा बनविले, आता ते मतांसाठी सुशिक्षित पदवीधरांना मामा बनवत आहे. त्यांच्या रक्तात, श्वासात काँग्रेस नसून फक्त सत्ता असल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये या संदर्भात महत्वपूर्ण बैठक आणि मेळावा झाला.
या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पदवीधर मतदारांच्या संवाद कार्यक्रमात काळे यांनी तांबे यांच्यावर टीका केली. पदवीधरांशी झालेल्या संवादानंतर जिल्ह्यात प्रचाराचे रणनीती निश्चित करण्यात आली आहे.
काळे म्हणाले, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार असलेल्या सत्यजित तांबे यांना नगर शहराने २९ हजारावर मतदान दिले मात्र पराभवानंतर त्यांच्यासाठी विरोधकांना अंगावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांसह या सर्व मतदारांना त्यांनी वाऱ्यावर सोडले. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी परत नगरकरांकडे बघितले सुद्धा नाही.
ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी तांबे यांच्या प्रचारात जिल्हा काँग्रेस उतरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर साळुंखे यांना प्रांताध्यक्ष पटोले यांनी कारणे दाखवून नोटीस बजावली आहे. साळुंखे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असून तांबे पिता-पुत्रांचे याआधीच काँग्रेसने निलंबन केले आहे. काळे यांच्यावर आता शहरासह जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना आक्रमक प्रचारासाठी कार्यरत करण्याची जबाबदारी पक्षाने सोपविली आहे.
जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. थोरात कधीही काँग्रेस विचारांशी प्रतारणा करू शकत नाही. मात्र काँग्रेसने ज्यांना वर्षानुवर्षे सत्ता दिली त्या तांबे यांनी मात्र काँग्रेस विचारांशी प्रतारणा केली. तांबे यांना पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी दिली होती. तसेच कोरा एबी फॉर्म दिला होता. त्यांना निवडणूक लढवायची नव्हती तर ते सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखल करू शकत होते. मात्र त्यांनी गद्दारी केली. सध्या राज्यात गद्दारांचे सरकार असून तांबे यांना भाजपमध्ये जायचे आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. भाजपच्या पाठिंबाने निवडणूक लढविणार असे म्हणत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. आता तांबे माझ्या श्वासात रक्तात काँग्रेस असल्याचे सांगत आहे. मात्र त्यांच्या रक्तात श्वासात फक्त सत्ता असल्याचे काळे म्हणाले.

