महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पुणे / अहमदनगर : आठवडाभराच्या अंतरात दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात सात मृतदेह आढळून आढळून आल्याने राज्यभरात खळबळ माजली होती. प्राथमिक तपासात सामूहिक आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेने आपला तपास देखील सुरूच ठेवला होता. आता मात्र या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून या सातही जणांची आत्महत्या नसून त्यांचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. कुटुंबातील नातेवाईकांनीच हे भीषण कृत्य केले असून चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात टप्प्याटप्प्याने आठवडाभरात तीन बालकांसह सात जणांचे मृतदेह आढळले होते. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या निघोजमध्ये हे कुटुंब गेल्या वर्षभरापासून मोलमजुरी करत होते. त्यामुळे या घटनेने खळबळ माजली होती.
पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेची दुसरी भयावह बाजू समोर आली असून नदी पात्रात आढळलेल्या सात जणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चार जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोहन पवार (वय ४५), त्यांच्या पत्नी संगीता (४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई), जावई श्याम फलवरे (२८), मुलगी राणी (२४), नातवंडे रितेश (७), छोटू (५) आणि कृष्णा (३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांचे मृतदेह भीमा नदीत आढळले. १७ तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुयातील निघोजमधून दौंड तालुयातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू बुडून झाला असल्याची नोंद आहे. मात्र हा प्रकार आत्महत्या की घातपात, याची चर्चा कायम होती. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. अधिक खोलात जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता नातेवाईकांनीही हा प्रकार आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटले होते. मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करून चौघांना अटक केली आहे.
यासाठी केला खून
या प्रकरणात पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय ४०), श्याम कल्याण पवार (वय ३०), प्रकाश कल्याण पवार (वय ३२) आणि आणखी एक त्यांचा भाऊ (नाव समजू शकले नाही) अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी सख्खे चुलत भाऊ आहेत. मोहन पवार यांच्या मुलासोबत आरोपींचा एक मुलगा दुचाकीवर काही दिवसांपूर्वी गेला असताना त्याचा अपघात झाला होता. या घटनेत मुलगा गंभीर जखमी होऊन त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, चार दिवस ही बाब पवार कुटुंबाने मुलाच्या पालकांना सांगितली नव्हती. या घटनेत दुर्दैवाने मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाचा खून पवार कुटुंबियांनी केल्याचा संशय चुलत भावांना होता. या रागातून त्यांनी बदला घेण्याचा कट रचला.
गावी जाण्याच्या बहाण्याने भीमा नदीजवळ नेले
घटनेच्या दिवशी आरोपींनी चुलत भाऊ मोहन पवार व त्याच्या कुटुंबियांना गावाला जाऊ, असे सांगितले आणि गाडीत बसवले. त्यानंतर ते भीमा नदीपात्राच्या जवळ गेले. तेथे आरोपींनी ७ जणांना मारून त्यांचे मृतदेह भीमा नदीपात्रात फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नेमके कशाप्रकारे आरोपींनी मयताना मारले, त्यांच्या खुनामागे अजून इतर कारण आहे का, याबाबत पुणे ग्रामीण पोलीसांची गुन्हे शाखा तपास करत आहे.

