महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | पुणे
पुण्याच्या न्यायालयाने शुक्रवारी एक महत्त्वाचा निवाडा केला आहे. मोहसीन शेख या तरुणाची हत्या केल्याच्या आरोपातून हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई व संघटनेच्या २० जणांची निर्दाेष सुटका केली.
सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. तेव्हा धनंजय देसाईने चिथावणीखोर भाषण केले होते. त्यानंतर शेख हा त्याचा भाऊ व मित्रांसह हडपसर येथील एका मशिदीत जात होता. तेथे बाईकवरून काहीजण आले. शेखच्या डोक्यावर टोपी होती.
एवढ्या एका कारणावरुन शेख व त्याच्या मित्रांवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. शेखला बॅटने मारहाण झाली. या मारहाणीत शेखचा मृत्यू झाला. हडपसर येथे २ जून २०१४ रोजी हा प्रकार घडला होता. शेखच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली होती.
शेख हा मुळचा सोलापूरचा रहिवाशी होता. तो पुण्यात आय. टी. कंपनीत काम करत होता. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला. ही हत्या हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी देसाईलाही अटक झाली.
न्यायालयात देसाईसह संघटनेच्या २० कार्यकर्त्यांवर शेखच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणात ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली, मात्र काही दिवसांनी निकम यांनी या खटल्यातून माघार घेतली. मात्र खटला सुरु राहिला.
आरोपींवर आरोप निश्चिती झाली. त्यांनी आरोप फेटाळल्यानंतर सरकारी पक्षाने त्यांच्याविरोधात सबळ पुरावे सादर केले. मात्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल देत देसाईसह सर्व आरोपींची शेखच्या हत्येतून सुटका केली.

