महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | संगमनेर
संगमनेर शहर पोलिसांनी दोन पिकअप वाहनांवर केलेल्या कारवाई सुमारे सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमात हस्तगत केला आहे. ६ जिवंत गोवंश जनावरांसह सुमारे दोन लाख रुपयांच्या गोमांसाचा यात समावेश आहे.
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असला तरी देखील संगमनेरमध्ये मात्र या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन सुरूच आहे. याला स्थानिक पोलिसांचे देखील पाठबळ मिळत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेकडोने टाकलेल्या छाप्यानंतर देखील येथील बेकायदा कत्तलखाने अद्याप बंद झालेले नाहीत. वारंवार टाकले जाणारे छापे आणि या छाप्यामध्ये निष्पन्न होणारे तेच तेच आरोपी यामुळे पोलिसांची कार्यपद्धतीच संशयास्पद बनली आहे. प्रत्येक कारवाईमध्ये आरोपी फरार असल्याचे दाखविले जाते. त्यामुळे पोलीस अशा प्रकारच्या छाप्यामधून नेमके काय साध्य करतात असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावर हॉटेल सम्राट समोर पोलीस पथकाने जाणारी पिक अप जीप अडवत तिची तपासणी केली असता त्यामध्ये कत्तलीच्या उद्देशाने सहा जिवंत जनावरांचे वाहतूक केले जात असल्याचे निष्पन्न झाले.
या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर महादू पिचड यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून इरफान नूर कुरेशी (रा. वडाळा नाका, नाशिक), जावेद सुलताना कुरेशी (रा. वडाळा गाव, नाशिक) आणि जाकीर बशीर शहा (रा. वडाळा गाव नाशिक) या तिघांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी पिकअप जीप, ६ जिवंत गोवंश जनावरांसह ४ लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तर शनिवारी मध्यरात्री केलेल्या दुसऱ्या कारवाईमध्ये संगमनेर खुर्द गावच्या शिवारात शिबलापुर-पिंपरणे रस्त्यावर असलेल्या शेतकी संघाच्या पेट्रोल पंपासमोर पोलीस पथकाने संशयित पिकअप जीप थांबविली असता, तपासणीमध्ये त्यात सुमारे दोन लाख रुपये किमतीचे जिवंत जनावरांचे कत्तल केलेले मांस आढळून आले. या कारवाईमध्ये पोलिसांनी गोमांस आणि पिकअप जीप असा ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश कारभारी गोलवड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हलीम युसुफ शेख (ह. रा. भारतनगर, मूळ रा. कासारा, ता. इगतपुरी) याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे शहर पोलिसांनी दोन्ही कारवाईमध्ये चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी देखील एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

