अनंत पांगारकर ¤ महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर शहर आणि तालुक्यात दररोज सुरू असलेल्या चोऱ्या, घरफोड्यांमुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून गुन्हेगारांचा शोध लावण्यास अपयशी ठरणाऱ्या पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवरील धाक संपल्याने संगमनेरकर चोर, भामट्यांच्या दहशतीखाली वावरत आहे. त्यातच पोलीस उपअधीक्षकांसह शहर पोलीस ठाण्यातील प्रभारी राज मुळे विविध गुन्ह्यांचा तपास अधांतरी लटकत असल्याने पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना कधी जेरबंद करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालण्याची मागणी संगमनेरकर करत आहे.
चोऱ्या, घरफोड्यांची मालिका सोमवारी देखील कायम होती. प्रजासत्ताक दिनी मावळतेला झालेली दरोड्याची घटना, डिसेंबरमधील संकेत नवले खून प्रकरण, दररोजच्या होणाऱ्या दुचाकी चोऱ्या आदी महत्त्वाच्या घटनांचा पोलिसांना अद्यापही उलगडा करण्यात यश आलेले नाही. गुन्ह्यांच्या तपासाबाबत पोलीस यंत्रणेकडे कोणतेही सकारात्मक उत्तर दिसत नाही. आजही अनेक गुन्हे पोलीस दप्तरी ‘तपासावर’ कायम आहेत.
सोमवारीदेखील सुकेवाडी येथे घरालगत असलेल्या किराणा व कपड्याचे दुकान चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश मिळवत उचकापाचक करीत जीन्स पॅन्ट, भारीतल्या साड्या, लहान मुलांचे कपडे, पैठणी, शर्ट तर किराणा दुकानातील बिस्किट आणि तंबाखूचे बॉक्सदेखील चोरून नेल्याची फिर्याद सविता विशाल गोसावी यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.
याशिवाय तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कवठे कमळेश्वर या ठिकाणी बाळासाहेब नाना भडांगे यांच्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले आणि ॲपल कंपनीचा मोबाईल असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याही प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान संगमनेर उपविभागाचा प्रभारी पदभार शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्याकडे तर शहर पोलीस ठाण्याचा प्रभारी पदभार पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्याकडे आहे. या दोन्ही ठिकाणी प्रभारी राज सुरू असल्याने त्याचा फायदा चोरट्यांनी उठविला आहे तर वरिष्ठांचा कोणताही वचक नसल्याने स्थानिक कर्मचारी फायद्याच्या कामात व्यस्त आहेत. शहर, तालुका, घारगाव, आश्वी, अकोले आणि राजुर या पोलिस ठाण्यावर वचक ठेवणारा खमका अधिकारी अद्याप पोलीस उपाधीक्षकांच्या रूपाने गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरला लाभलेला नाही.
गुन्ह्याची माहिती सोईस्करपणे दडविण्याकडे पोलिसांचा कल
दरम्यान संगमनेर उपविभागामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी बोकाळली असून विभागातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, अकोले आणि राजुर पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत आहेत. महिनाभरात 250 हून अधिक गुन्हे उपविभागात दाखल झाले. या गुन्ह्यांची माहिती माध्यमांपासून सोयीस्करपणे दडविली जात आहे. माध्यमांमधून चर्चा झाल्यास स्थानिक पोलीस यंत्रणेचे अपयश अधोरेखित होत असल्याने विविध कारणे सांगून गुन्ह्याची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसते.

