महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवीन आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघावर सलग चौथ्या निवडणुकीतही तांबे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. सत्यजित तांबे यांनी अपेक्षित मतांचा कोठा पूर्ण केला. त्यांनी महाविकास आघाडीने परस्पर केलेल्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे.
राजकीय घडामोडींमुळे रंगतदार ठरलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात कोण गुलाल उधळणार याविषयी आता राजकीय चर्चांना जोर आला होता. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळून देखील आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुदतीत एबी फॉर्म न मिळाल्याने तांबे यांनी आपले उमेदवारी अपक्ष असल्याचे सांगितले होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल न करणाऱ्या आमदार सुधीर तांबे आणि बंडखोरी करणाऱ्या सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली. सत्यजित तांबेंची बंडखोरी आणि ऐनवेळी महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवत रिंगणात उतरलेल्या शुभांगी पाटील यांच्यासह १६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरुवारी मतमोजणीतून झाला. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली असल्याच्या निवडणूक निकालातून समोर आले आहे.
गुरुवारी नाशिकच्या सय्यद पिंप्री येथील नवीन शासकीय गोदामात मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीकरीता ३०० अधिकारी, कर्मचारी तसेच २५० पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
पदवीधर निवडणुकीसाठी ३० जानेवारी रोजी विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ३३८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा गतवर्षीपेक्षा पाच टक्के मतदान कमी झाले. विभागात ४९.२८ टक्के मतदान झाले. विभागातील २ लाख ६२ हजार ६७८ पैकी १ लाख २९ हजार ४५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी घसरल्याने त्याचा निकालावर काय परिणाम होईल याचे आडाखे उमेदवारांच्या समर्थकांकडून बांधले जात होते.
प्रत्यक्ष मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर निवडून येण्यासाठी 58,310 मतांचा कोठा निश्चित करण्यात आला होता. सत्यजित तांबे व शुभांगी पाटील या दोन प्रमुख उमेदवारांसह बहुजन आघाडीचे रजन बनसोडे, स्वराज्य संघटनेचे सुरेश पवार यांच्यासह १६ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. पाटील या धुळयाच्या तर तांबे हे नगर जिल्हयातील आहेत. तांबे यांना भाजपकडून छुप्या पध्दतीने बळ मिळाले तरी आपण अपक्षच आहोत अशी भूमिका मांडली. तर पाटील यांच्या पाठीशी महाविकास आघाडीने ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला. एकाही पक्षाचा अधिकृत उमेदवार या निवडणुकीत नसल्याने अपक्ष उमेदवारांच्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तांबे यांच्या खेळीतून काय साध्य झाले हे निकालातून समोर आले आहे.
पहिल्या पसंतीची सर्वाधिक ६८ हजार ९९९ मत मिळवून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी श्री. तांबे यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.
सत्यजित तांबे यांनी निश्चित कोट्यापेक्षा १० हजार ६८९ मते अधिक प्राप्त केली.त्यांना ६८ हजार ९९९ मत प्राप्त झाली आहेत. एकूण मतमोजणी नतंर १ लाख १६ हजार ६१८ मत वैध ठरली तर १२ हजार ९९७ मत अवैध ठरल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण् डी., जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.
अशी झाली मतमोजणी
सैय्यद पिंप्री येथील गोदामात मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. प्रथम सर्व ३३८ मतदान केंद्रांवरील मतपत्रिकांचे ५०-५० चे गठठे करण्यात आले. या गठठयांचे एत्रिकरण झाल्यानंतर प्रत्येक टेबलावर एक हजार याप्रमाणे एकूण २८ टेबलांवर पहिल्या पसंतीच्या मतमोजणीस सुरूवात झाली. पाच फेर्यात ही मतमोजणी घेण्यात आली यात अपेक्षित मतांचा कोठा तांबे यांनी पूर्ण केला. त्यामुळे दुसऱ्या पसंतीचे मते मोजण्याची वेळ प्रशासनावर आली नाही.
उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे
वैध ठरलेल्या मतांपैकी एकूण 16 उमेदवारांना प्राप्त पहिल्या पसंतीचे मते पुढील प्रमाणे
=========================
➡️ सत्यजित सुधीर तांबे : 68999
➡️ शुभांगी भास्कर पाटील: 39534
➡️ रतन कचरु बनसोडे :2645
➡️ सुरेश भिमराव पवार :920
➡️ अनिल शांताराम तेजा :96
➡️ अन्सारी रईस अ.अब्दुल कादीर :246
➡️ अविनाश महादू माळी :1845
➡️ इरफान मो इसहाक :75
➡️ ईश्वर उखा पाटील :222
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे :710
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख :366
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले :271
➡️ नितीन नारायण सरोदे :267
➡️ पोपट सिताराम बनकर :84
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे :151
➡️ संजय एकनाथ माळी :187याशिवाय राज्यातील विधान परिषदेच्या पाचही जागांवरील हे आहेत निवडून आलेले नवे आमदार
Ⓜ️कोकण:- ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप)
Ⓜ️नागपूर:- सुधाकर आडबाले (मविआ)
Ⓜ️औरंगाबाद:- विक्रम काळे (मविआ)
Ⓜ️अमरावती:- धीरज लिंगाडे (मविआ)
Ⓜ️नाशिक:- सत्यजित तांबे (अपक्ष)

