महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. कॉग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विजयानंतर त्यांची पुढील वाटचाल कशी असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतांनाच एकीकडे भारतीय जनता पक्षाने त्यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली असतांनाच दुसरीकडे कॉग्रेसचेही दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना एक महत्वाचा राजकीय सल्ला दिला आहे.
अजित पवार म्हणाले, इतके दिवस चेंडू कॉग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्याला कॉग्रेस, भाजपा त्यांच्याकडे बोलाविण्याचा प्रयत्न करणार. आता पुढे त्याला बरीच वर्ष राज्याच्या राजकारणात काम करायचे आहे. त्याला पुढे त्याचे राजकीय भवितव्य आहे. या सगळ्याचा विचार करुन त्याने निर्णय घ्यायचा आहे.
सत्यजीत तांबेचे घराणे कॉग्रेस पक्षाच्या विचारधारेशी निगडीत आहे. मधल्या दीड महीन्याच्या काळात काय झालं हे त्यान जास्त मनाला लावून न घेता, त्यान पुन्हा कॉग्रेसबरोबर जावं. बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे हे घरातले मोठे नेते आहेत. ते सांगतील ते ऐकाव, याउपर काय करायच हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे. त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते. त्यामुळे दैदिप्यमान यश मिळाले.
४ फेब्रुवारीला भूमिका स्पष्ट करणार
दरम्यान तांबे यांनी विजयानंतर शुक्रवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिस्थळावर जात त्यांना वंदन केले. यावेळी माध्यमांसोबत बोलतांना ते म्हणाले, कॉग्रेसकडून लढलो असतो तर विजय आणखी सुकर झाला असता, दुदैवाने तसे झाले नाही. त्यामुळे तो थोडा क्लेशदायक बनला. १४-१५ वर्षाच्या कालखंडात डॉ. तांबेची या मतदारसंघातजुळलेली नाळ यामुळे मतदार आणि लोक सोबत राहीले. ऋणानुबंध राजकीय पक्षापलिकडे आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमचे कुटूंबप्रमुख आहेत. ते आणि आम्ही वेगळे नाही. सध्या ते आजारी असून उपचार घेत आहे. त्यांच्याशीदेखील बोलणार आहे. गेल्या काही दिवसातील घडलेल्या राजकारणाबद्दल व पुढील भुमिकेबद्दल शनिवारी ४ फेब्रुवारीला सविस्तर बोलणार आहे.
भाजपची खेळी जिव्हारी लागली
भाजप दुसऱ्यांचे घर फोडते. दुसऱ्यांचे घर फोडतांना ते हसत आहेत. जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना समजेल असे मी मागे म्हटले असल्याचा पुनरुच्चार करत कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आज अमरावती, नागपुर अशा दोन्ही विभागात भाजपच्या अनेक नेत्यांनी आम्हाला मदत केली. नाशिकच्या जागेसाठी भाजपने केलेली खेळी आमच्या जिव्हारी लागली आहे. त्या भागातून त्यांनी आमचा एक नेता नेला. भविष्यात तेथून कॉग्रेसचे आमदार निर्माण होतील अशी रणनिती आखली आहे. राष्ट्रवादीने तांबे यांना मदत केली आहे. जेव्हा महाविकास आघाडीची बैठक होईल तेव्हा या बाबींचा खुलासा होईल.

