महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेरमध्ये गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोऱ्या, घरफोड्या, हाणामाऱ्या ही नित्याची बाब झाली आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संगमनेर व्यापारी असोसिएशनने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
संगमनेरचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना या पार्श्वभूमीवर निवेदन देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात स्थानिक पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला असून गुन्हेगारांनी संगमनेरात आपले हातपाय पसरले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या खून प्रकरणाचा आणि त्या पाठोपाठ शहरात व परिसरात झालेल्या दरोडेच्या घटना चोऱ्या यांची उकल करण्यात पोलीस अयशस्वी ठरले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे हैराण झालेल्या संगमनेरकरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याने शहरात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपाधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात दिवसें-दिवस चो-या, दरोडे व गुन्हेगारी वाढत चालली आहे. गेल्या दोन-तीन महीन्यापासून संगमनेर शहर, उपनगरे व परिसरात चोरी, दरोडा व गुन्हेगारी वाढत चालली आहे, त्यामध्ये वृध्द, महीला व लहान मुलांवर जीवघेणे हल्ले करून गुन्हेगार पसार होत आहे. संगमनेरात मोठी बाजारपेठ असल्याने या बाजारपेठेत लग्नसराईच्या काळात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. दिवसा चोरी, दरोडे यांचे प्रमाण उपनगरात वाढत आहे. त्यामुळे व्यापारी व जनतेमध्ये भिती, दहशत आणि असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात संगमनेर पोलिस ठाण्याचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पोलिस प्रशासनाचा वचक राहीलेला नाही. सबब शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक राजेंद्र भोसले यांची त्वरीत बदली त्यांच्या जागेवर दुसरा सक्षम, कर्तव्यदक्ष अधिकारी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
केवळ व्यापारी संघटनाच नाही तर शहरातील सर्व जनतेच्या प्रतिनीधीक भावना आम्ही निवेदनात व्यक्त केल्या असल्याचे सांगत या सर्व बाबींवर गंभीरतेने दखल घेवून कार्यवाही करण्याचे मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एका आठवडयाच्या आत कार्यवाही न झाल्यास, संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येतील. त्यामुळे पोलीस उपाधीक्षक सातव यांनी तातडीने संगमनेर शहर, संगमनेर तालुका घारगाव आश्वी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची बैठक घेत गुन्हेगारीचा कडक बंदोबस्त करण्याचे निर्देश देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उपाधीक्षक सातव यांच्या ऐवजी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी व्यापारी असोसिएशनचे निवेदन स्वीकारले. निवेदन देताना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट, सचिव शरद गांडोळे, सहसचिव जुगलकिशोर बाहेती, खजिनदार अरुण शहरकर, संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीगोपाळ पडतानी, शिरिष मुळे, प्रकाश कलंत्री, संचालक प्रकाश राठी, नरेंद चांडक, संजय कुटे, कपिल टाक, प्रकाश वालझाडे आदी व्यापारी उपस्थित होते.
शहरातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण; गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी उपाधीक्षकांना दिले निवेदन
गुन्हेगारांचा शोध लावण्यात अपयशी ठरलेली पोलीस यंत्रणा संगमनेरकरांना दिलासा देणार का

