महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिक पदवीधर निवडणुकीत निवडून आलेल्या सत्यजित तांबे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी अधिकृतरित्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याचबरोबर त्यांनी आपला धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केल्यानंतर शिवसेनेने पाटील यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला. तांबे यांच्या विरोधात कडवे झुंज देताना पाटील यांनी या मतदारसंघात सुमारे 40 हजार मते मिळविली. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या पाटील यांना भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावत शिवसेनेचा पाठिंबा मिळविला होता.
निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधले. त्यानंतर आता खरी लढाई सुरू झाल्याचा सुचक इशारा शुभांगी पाटील यांनी दिला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील आता या मतदारसंघात नव्याने बांधणी करणार आहे. मातोश्री बाहेर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या मी दोन फेब्रुवारीलाच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार मी शनिवारी मी शिवबंधन हाती बांधले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे विजयी झाले असले तरी मला हे जवळपास 40000 मते पडली आहे. एका सामान्य लेकीच्या मुलीने एवढी मते मिळविणे म्हणजे सामान्य बाब नाही. ही कमी पुढील निवडणुकीत भरून काढू. शिवसेना पक्ष माझ्यावर जी जबाबदारी सोपवेल ती जबाबदारी मी पार पाडेल. निवडणुकीत मी कुठे कमी पडले याचा विचार करून पुन्हा कामाला लागणार आहे. महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत माझ्यासोबत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर माझ्यासाठी नाशिकमध्ये दोन सभा घेतल्या, असे देखील त्यांनी सांगितले.
निवडणुकीतील पराभवानंतर पाटील म्हणाल्या होत्या झाशीची राणी जशी लढली तसे मला लढायचे होते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार मी शिवसेनेला कधीही सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे, आणि शिवसैनिकच राहणार. शुभांगी पाटील यांच्या या वक्तव्यावर भाजपने टीका करत महाविकास आघाडीला लक्ष केले होते. झाशीच्या राणीसोबत केलेली तुलना महाविकास आघाडीच्या नेत्यांना चालते का असा सवाल भाजपचे अतुल भातखळकर यांनी केला होता.
धरणे आंदोलन करणारच
पाटील म्हणाल्या शिवसेनेतील प्रवेशानंतर माझी खरी लढाई आता सुरू झाली आहे. जुनी पेन्शन योजना, बेरोजगारीच्या मुद्द्यावर मी आता आक्रमकपणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार आहे. या मुद्द्यावर मी एक दिवस धरणे आंदोलन करणार आहे तसेच महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल.

