अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
सत्यजित तांबेंची बंडखोरी, तांबे भाजपच्या वाटेवर आदी प्रकारच्या अनेक बातम्यांनी गेल्या महिनाभरातील वातावरण ढवळून निघाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत वादाचा माध्यमांनी फुगवलेला फुगा अखेरीस फुटला आहे. पत्रकार परिषदेत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षातील नेत्यांवर टीका करत थोरात तांबे परिवारा विरोधात पक्षातूनच षडयंत्र रचल्याचे सांगत आपण अपक्ष म्हणून यापुढे काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी अखेरीस शनिवारी सर्वच राजकीय घडामोडींवर शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करत सर्वच वादांवर पडदा टाकला आहे. तांबे यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे ते भाजप सोबत जाणार असल्याचे वृत्त अखेरीस अफवा ठरले आहे. पक्षाने कोरे एबी फॉर्म दिल्याचा तसेच उमेदवार ठरविण्याचा अधिकार कुटुंबीयांना दिल्याचे सांगताना आम्हाला जे एबी फॉर्म पाठविण्यात आले ते नाशिक पदवीधर चे नसून औरंगाबाद आणि नागपूर मतदार संघाचे कोरे एबी फॉर्म होते. बंद लिफाफ्यात आमचा माणूस दिवसभर नागपूरला बसल्यानंतर आम्हाला चुकीचे कोरे एबी फॉर्म देण्यात आले. याची माहिती पक्षाला दिली होती. तसेच अन्य मतदार संघाचे उमेदवारी मुंबईतून जाहीर होत असताना आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिल्लीतून जाहीर करण्यात आली.
दिल्लीतून जाहीर करण्यात आलेल्या फक्त सुधीर तांबे यांचे नाव होते. मात्र या फॉर्मवर पर्यायी दुसऱ्या उमेदवाराचे नाव नव्हते. त्यामुळे पक्षाला मला उमेदवार द्यायची नाही हे स्पष्ट झाले होते.
एकीकडे या सर्व घडामोडीनंतर मी दिल्लीतील श्रेस्ठीसोबत बोलत असताना दुसरीकडे माझ्या विरोधात पक्षातील नेत्यांनीच महाविकास आघाडीचा पाठिंबा दुसऱ्या उमेदवाराला जाहीर केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एवढा गलतन कारभार कसा करू शकते असा प्रश्न करत आणि निवडणुकीआधी अशी गंभीर चूक करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस वर दिल्लीतून कारवाई केली जाणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या 22 वर्षापासून मी काँग्रेसमध्ये काम करत आहे. मी काँग्रेस सोडलेली नाही. प्रदेशाध्यक्ष असताना राज्यात काँग्रेस वाढविण्यासाठी काम केले. प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार संपल्यानंतर मला एखादी जबाबदारी द्या, अशी मागणी पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली होती. मात्र मला आमदार खासदारकीची कोणतीही हाव नव्हती. मात्र पाटील यांनी माझी मागणी फेटाळत घरात वडील आमदार असताना मला पद देता येणार नाही, असे सांगितले. तरी देखील मी हट्ट सोडला नाही. त्यानंतर पाटील यांनी नाशिक पदवीधर म्हणून निवडणूक लढवावी म्हणून सुचविले. त्यामुळे मला संताप आला होता. मला माझ्या कर्तुत्वावर पक्षात काही निर्माण करायचे होते, वडिलांच्या जागेवर नव्हे.
माझ्या राजकीय कारकिर्दी विषयी वडील सुधीर तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत परिवारात चर्चा केली असता मी बाजूला होतो तू नाशिक पदवीधर ची निवडणूक लढव असे वडिलांनी सांगितले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी आम्ही पक्षश्रेष्ठी आणि प्रभारींशी यासंदर्भात चर्चा केली. त्यावर उमेदवारी अर्ज तुमच्या दोघांपैकी कोणी भरायचा ते ठरवा, आम्ही एबी फॉर्म पाठवतो असेच सांगितले होते. त्यामुळे दिल्लीतून देखील माझ्या उमेदवारीला होकार होता.
एबी फॉर्म नागपूरहून मिळतील असे सांगितल्याने माझा माणूस नऊ जानेवारीला सकाळी नागपूरला पाठविला. मात्र दिवसभर त्याला एबी फॉर्म देण्यात आले नाही. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत त्याला बसून ठेवले. त्यानंतर सात वाजता सीलबंद पाकिटात हे एबी फार्म देण्यात आले, मात्र ते दुसऱ्याच मतदारसंघाचे होते. तरीदेखील मी काँग्रेस पक्षाकडूनच माझी उमेदवारी दाखल केली होती मात्र एबी फॉर्म नसल्याने ती अपक्ष कन्व्हर्ट झाली.
यासंदर्भात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील चर्चा केली मात्र त्यांनी स्पष्टपणे काँग्रेस विरोधात जायचे नाही असे सांगितले. पक्षांतर्गत चुकीच्या भूमिकेमुळे मला अशी भूमिका घ्यावी लागली. थोरात-तांबे परिवाराविरोधात पक्षातूनच षडयंत्र रचले गेले आहे. आपण काँग्रेस कधीही सोडलेली नाही राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत असताना पक्षातील नेते मात्र वेगळ्याच भूमिकेत काम करत आहे असे देखील तांबे म्हणाले.
उमेदवारी दाखल केल्यानंतर आपण सर्वच पक्षाची मदत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपनेही मला मदत केली याशिवाय सर्वच पक्ष आणि शिक्षक संघटना सोबत होत्या.
सभागृहात मात्र यापुढे आपण अपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचे सांगताना तांबे यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. निवडणुकीच्या या काळात परिवाराला बदनाम करण्याचे काम झाले असून माध्यमांनी देखील चुकीच्या पद्धतीने वृत्तांकन केले आहे. त्यांनी देखील खात्री करून वृत्तांकन करावे, असा सल्ला तांबे यांनी माध्यमांना दिला.

