काही लोकांच्या जिभेलाच हाड नसतं, असं म्हणतात. स्वत:चं महत्व वाढवण्याकरता समाजासाठी काही करण्याऐवजी ते दुसर्याला कमी लेखण्यात आणि दोष देण्यात धन्यता मानतात. राज्य भाजपचे प्रदेश प्रमुख झाल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे असंच काही बाही बडबडू लागले आहेत. प्रदेश प्रमुख झालं की असंच बोलावं लागतं अशी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची बोली बनली आहे. याआधी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटीलही असंच काही बोलायचे. त्यांच्याही जिभेला टेकू नव्हता. त्यात राष्ट्रवादीवर टीका केली की पक्षात बक्षिसी मिळते आणि पवारांवर टीका केली की प्रमोशन.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे भाजपच्या नेत्यांसाठी सोपं टार्गेट असतं. केवळ जीभ आहे म्हणून अशिष शेलार, नितेश राणेंसारखे नेतेही पवारांवर टीका करत असतात. काहीही टीका केली तरी पवार बोलत नाहीत. टीकाकार तोडीचा असेल तरच त्यावर प्रतिक्रिया देण्याचा शिरस्ता पवारांनी राखलाय. मात्र त्यामुळे बडबड करणार्या भाजप नेत्यांना आपण बोलतो तेच खरं असं वाटतं. मध्यंतरी भाजपच्या तमाम केंद्रिय नेत्यांनी पवारांची बारामती पिंजून काढण्याची मोहीम हाती घेतली होती. कोणत्याही निवडणुका नाहीत की मेळावे. तरीही अचानक बारामतीच्या मोहिमांचा बाजार कसा सुरू झाला हे कोणीच सांगू शकत नव्हतं. अर्थमंत्री निर्मला सीतारमन आल्या. त्या जात नाहीत तोच जे. पी. नड्डा आले. मिशन बारामती नावाच्या मोहिमेच्या नावाने त्यांनी बारामतीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
फडणवीस यांनी तर बारामतीसह राज्यात 240 जागा जिंकण्याचा पण केला आहे. यामुळे लॉटरी लागलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना तेव्हा कोण आनंद होणं स्वाभाविक होतं. ते हुरळून गेले. बारामतीत पवारांचा करेक्ट कार्यक्रम करू, अशा घोषणा ते करू लागले. राजकारणाची 15 वर्षं भाजपमध्ये घालवलेल्या आणि काही काळ त्या पक्षाकडून मंत्री बनलेल्या. पुढे उमेदवारीपासून दूर गेलेल्या बावनकुळ्यांना बारामती कळलीच नाही, असंच म्हणावंसं वाटतं. ज्यांना स्वत:चा मतदारसंघ सांभाळता येत नाही ते बारामतीला धक्के द्यायला निघाल्यावर काय म्हणणार?
राज्य विधानपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसलेले धक्के लक्षात घेता बावनकुळे जमिनीवर येतील, असं मानूया. निवडणुका हा धक्का ते कसा पचवतात हे काळच ठरवील. पण आजतरी भाजपच्या नेत्यांच्या डोक्यातील माज स्पष्ट दिसतो आहे. या निवडणुकांचा निकाल म्हणजे प्रदेश प्रमुख म्हणून बावनकुळे तोकडे पडत आहेत की काय, अशी शंका त्यांचेच कार्यकर्ते घ्यायला लागले आहेत. आपली कमजोरी लपवण्यासाठी इतरांच्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण करण्याची खासी पध्दत भाजपच्या नेत्यांची आहे. प्रचंड खोटं बोलणं हा त्यांचा स्थायीभाव. तेव्हा ते अजित पवार, जयंत पाटलांनाच काय पण थेट शरद पवारांनाही चॅलेंज देऊ शकतात. विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी हेच केलं. ताकदीचे दंड फुगवले पण हाती धुपाटणं लागलं.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र दूरच पण स्वत:च्या बालेकिल्ल्यात जिथे स्वयंघोषित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बलस्थान आहे. नितीन गडकरी यांचं बस्थान आहे. बावनकुळ्यांची मालकी आहे अशा नागपूरमध्ये शिक्षकांनी भाजपचा धोबीपछाड करणं हे अगदीच सामान्य नाही. एकट्या नागपूरमध्येच नाही तर अमरावतीतही भाजपचा हिरमोड झाला आहे. अमरावतीची जागा तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केलेली उमेदवारी होती. रणजित पाटील विजयी झालेच पाहिजेत, असा आदेश फडणवीसांचा होता. रणजित म्हणजे मीच, असा संदेश ते पक्ष कार्यकर्त्यांना देत होते. यामुळे भाजपने ही जागा अधिक प्रतिष्ठेची केली होती. पराभव झाल्यावर आम्ही एकटेच होतो, असं सांगणारे भाजप नेते एनडीएतील घटकांनाही सहज विसरतात हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
नागपूरमध्ये झालेल्या लढतीत विद्यमान आमदार नागो गाणार यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली होती. ही जागा महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनेला देण्याचं निश्चित झालं होतं. मात्र सत्यजित तांबे यांनी अचानक अपक्ष उमेदवारी भरल्याने गोंधळ उडाला. आणि नागपूरची जागा लढवण्याचा निर्णय काँग्रेसला घ्यावा लागला. सुधाकर अडबाले यांना उमेदवारी देण्यात आली. नागपूरमध्ये टिकाव लागणं महाविकास आघाडीसाठी कोसभर दूरचंच होतं. नितीन गडकरींपासून फडणवीस यांनी सारं काही पिंजून काढलं. बावनकुळे तर डेरा टाकूनच होते. तरीही अडबाले निवडून आले. परंपरेने भाजपकडे असलेली जागा प्रथमच काँग्रेसने हिसकावून घेतली. हा चमत्कार नव्हता. जुन्या पेंशनचं निमित्त केलं जातं. पण ते तर कोकणातही होतं. मग तिथे यश आणि इथे अपयश, याचा अर्थ भाजप नेत्यांनी समजून घेतला पाहिजे.
सत्यजित तांबेंच्या खांद्यावरून बंदूक झाडली नसती तर नाशिकही हातातून गेलं असतं. दुसर्यांची घरं फोडून स्वत:चे मजले उभारणार्या भाजपची मदार आजही परपक्षातल्या कार्यकर्त्यांवर विस्तारली आहे, हे तांबेंच्या उमेदवारीने पुन्हा अधोरेखित केलं. पक्ष वाढीसाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्यांना दूर ठेवण्याची कला भाजपइतकी कोणालाही साधता आलेली नाही. ‘सिटिझनविल’ या सत्यजित यांच्या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशनापासून फडणवीस नाशिकला गळ टाकत होते. त्यात तांबे अडकले म्हणून यशाची नोंद झाली. सत्यजित यांना भाजपत घेणं म्हणजे स्वत:ला पक्षांतर्गत स्पर्धक तयार करण्याला निमंत्रण देण्यासारखं असल्याची सुजित विखेपाटील यांची भीती अगदीच अनाकलनीय नाही. सत्तेच्या लाभासाठी भाजपत दाखल झालेल्या विखेपाटील परिवाराने सोयीने आपली चूल बदललेली दिसते.
संधी पाहून ते उड्या मारतात आणि स्वत:ची चूल निर्माण करतात. कोणाचंही आव्हान त्यांना नको असतं. अशात सत्यजितसारख्यांना सांभाळणं म्हणजे पायावर दगड मारून घेण्यासारखंच होय.
ज्या कोकणचा दावा भाजप नेते सांगतात त्या कोकणात एका मताला 6 हजार रुपयांचा रेट नसता तर तिथेही अस्मान पाहायला मिळालं असतं, ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांची उमेदवारी ही सेनेच्या शिंदे गटाची. यामुळे पक्ष म्हणून तिथेही भाजपला संधी मिळालेली नाही. म्हात्रे यांचा विजय म्हणजे वाटलेल्या पैशांवर मिळालेला मलिदा म्हणता येईल. ज्यांच्या पराभव झाला त्या बाळाराम पाटलांच्या समर्थकांनीही यात हात मारून घेतला. सेनेच्या पाठिंब्याशिवाय गत निवडणुकीत विजयी होणारे बाळाराम पाटील सेनेच्या पाठिंब्यानंतरही पराभूत होतात याचा अर्थ स्वत: पाटील यांना कळला असेल तर ठिकच. सेनेला दोष देण्याआधी आपल्याच नेत्यांनी फसगत केल्याचं सांगितलं जातं. आगामी होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीशी या शिक्षक मतदारसंघातील मतदानाचा संबंध जोडला जातो. कोकणच्या निवडणुकीत चक्क 1600 मतं बाद ठरतात याचा अर्थ पेशाने शिक्षक असलेल्या मतदारांची मानसिकताही लक्षात घेतली पाहिजे.
परिषदेच्या या निवडणुकीतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाजपला निवडणूक नीतीत बदल करण्याशिवाय पर्याय नाही. केवळ पैशांनी मतं विकत घेता येत नाहीत. परपक्षाच्या नेत्यांवर टीका करणं, त्यांच्यावर खोट्या आरोपात कारवाया करणं, नेत्यांच्या बाष्कळ बडबडीचाही परिणाम मतदारांवर होत असतो. रेटून खोटं बोलण्याचाही उबग येत असतो. हे असंच चालू राहिलं तर आगामी निवडणुकीत भाजपच्या पारड्यात अपयश पडलं तर आश्चर्य वाटायला नको…
बावनकुळे बारामतीला कसं हरवाल?
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी संपादक आहेत

