महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
ऊस तोडणी मजुराच्या नऊ वर्षाच्या मुलाचा प्रवरा डावा कालव्यामध्ये पाय घसरून पडल्याने कालव्याच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.
रितेश संदीप राठोड (रा. जळगाव) असे कालव्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. प्रवरा नगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी सध्या सुरू आहे. ऊस तोडणी साठी या कारखान्याकडे जळगाव जिल्ह्यातील करगाव येथून काही ऊस तोडणी मजूर आलेले आहेत. ते आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्याजवळील महादेव पुलाजवळ शेळके वस्तीवर हे मजूर कोप्या टाकून राहत आहे.
रविवारी यातील संदीप राठोड आणि त्यांची पत्नी ऊस तोडणीसाठी गेले असताना त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा रितेश हा घरीच होता. दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान रितेश हा प्रवरा डाव्या कालव्यावर गेला असता पाय घसरून तो कालव्यामध्ये पडला. त्याला कालव्यात पडत असताना काही तरुणांनी बघितल्याने त्यांनी तातडीने पाण्यात उड्या घेत त्याला शोधून काढले. उपचारासाठी त्याला लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला होता.
वैद्यकीय उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेत पुढील विधीसाठी जळगाव जिल्ह्यातील करगाव या गावी नेल्याची माहिती मिळाली आहे.

