१८८५ साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला त्याग आणि बलिदानाची मोठी परंपरा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या राष्ट्रीय नेत्यांप्रमाणे महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख या नेतृत्वाची मोठी समृद्ध परंपरा या पक्षाला लाभली आहे. या समृद्ध परंपरेचा विचार जोपासत अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळत या पक्षाला सन्मानजनक विजय मिळवून देत महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभाग मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे बाजीप्रभू माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षासाठी यशस्वी प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत.
१९८५ मध्ये समाजकारणातून राजकारणात आलेल्या बाळासाहेब थोरात यांची आमदारकी चढत्या क्रमाने वाढत गेली तसे मंत्रीपदही चढत्या क्रमाने वाढत गेले. १९९९ मध्ये राज्यमंत्री, २००४ मध्ये कॅबिनेट, कृषी व जलसंधारण मंत्री, २००९ मध्ये शालेय शिक्षण व राजशिष्टाचार, रोजगार हमी, कृषी ही महत्त्वाची मंत्रिपदे तर २०१० मध्ये महसूल खात्यासारखे प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचे खाते त्यांनी समर्थपणे सांभाळले. काँग्रेस पक्ष आणि सरकार यामध्ये समतोल साधत अधिकाधिक विकासाच्या योजना त्यांनी राबवल्या. पहिल्या महसूल मंत्री पदाच्या काळात सुवर्ण जयंती राजस्व अभियान यशस्वीपणे राबवून या खात्याला हायटेक भरारी दिली. ऑनलाईन सातबारा, फेरफार याचबरोबर संगणकाद्वारे मोजणी हे त्यांचे अभिनव उपक्रम संपूर्ण देशाला दिशादर्शक ठरले. विद्यार्थ्यांना शाळेतच ८० लाख दाखले वाटण्याच्या महसूल विभागाच्या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
२०१४ मध्ये पक्षाचा एक लोकाभिमुख चेहरा म्हणून नामदार बाळासाहेब थोरात संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या मनावर अधिराज्य करत होते. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या २०१४ मध्ये भाजप सरकारच्या विरोधात जनमानसात २०१४ ते २०१८ या कालावधीत त्यांनी आवाज उठवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचे झंझावाती दौरे करून काँग्रेस पक्षाला नवचैतन्य दिले. यातच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्याकडून मिळालेली पक्षनिष्ठा व बाळकडू यामुळे थोरात यांनी काँग्रेस पक्षासाठी केलेल्या प्रामाणिक कामाची दखल घेत काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुजरातसारख्या भाजपप्रणीत राज्याच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी थोरात यांची निवड केली अतिशय नियोजनपूर्वक या निवडणुकीत कार्यक्षमतेने काम करणाऱ्या थोरात यांची राष्ट्रीय पातळीवर गुजरातपाठोपाठ हिमाचल प्रदेश निरीक्षकपदी निवड झाली.
काँग्रेस पक्षात दिवसेंदिवस नामदार थोरात यांच्या कार्याची कमान वाढत गेली. या दरम्यान २०१८ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमधील अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी कायम निमंत्रित सदस्य म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान झाला. राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रभावीपणे काम करणाऱ्या नेत्याकडे महाराष्ट्रात नेतृत्व येणार हे साहजिकच होते. २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान खा. राहुल गांधी यांची ५ मे २०१९ रोजी संगमनेरमध्ये झंझावाती प्रचार सभेचे अत्यंत नीटनेटके नियोजन आणि लोकाभिमुख चेहरा असलेल्या थोरात यांच्यावर पक्ष नेतृत्वाचा विश्वास अधिक दृढ झाल्याची चिन्हे राहुल गांधी यांच्या संगमनेर मुक्कामातून दिसून आली.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला अवघा एकच खासदार निवडून आला. अनेक मातब्बर नेते पक्ष सोडून जाऊ लागले. अशावेळी पक्षनेतृत्वाने अध्यक्षपदाची माळ थोरात यांच्या गळ्यात घातली. अत्यंत अडचणीच्या काळामध्ये या पक्षाला स्थिरावण्याचे मोठ आव्हान होतं, परंतु स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असल्याने त्यांनी हे आव्हान स्विकारले. पक्षांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं तरुणांना विश्वास दिला. गावोगावी पक्षसंघटन मजबूत करताना काँग्रेस पक्षाला विधानसभेत ४४ जागा निवडून दिल्या. कधीही न होणारे समीकरण म्हणजे महाविकास आघाडीचा योग जुळून आणला आणि राज्यात सरकारमध्ये काँग्रेसला मानाचे स्थान मिळाले.
अर्थातच काँग्रेसचे गटनेते पद, प्रदेशाध्यक्षपद आणि क्रमांक एकचे नेतृत्व असलेल्या थोरात यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवाजी पार्कवर झालेल्या ऐतिहासिक सोहळ्यात पुन्हा एकदा महसूल मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व कालखंडामध्ये पक्षाला बळकटी देणे, शासनाचे उपक्रम जनतेच्या दारी पोहोचवणं हा सातत्याचा उपक्रम नामदार थोरात यांनी सुरू ठेवला. राज्याबरोबर आपल्या संगमनेर तालुक्यात विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवताना संगमनेर तालुक्याला सहकार, समाजकारण, शिक्षण आणि ग्रामीण प्रगतीतून आर्थिक विकासाचे बनवलेले हे मॉडेल आज राज्य व देशासाठी दिशादर्शक ठरले आहे.
२०२० मध्ये कोरोनाचे संकट उभे ठाकले. फाळणीनंतर मोठे स्थलांतर जनतेने पाहिले. अनेक मजूर महाराष्ट्र सोडून जाऊ लागले आणि त्यांच्या हालअपेष्टांच्या काळात महसूल प्रशासन व कार्यकर्त्याला या लोकांच्या मदतीसाठी प्रोत्साहित केले. अत्यंत अडचणीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांचेसोबत ना. थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दररोज किमान १८ तास काम केले. ना. थोरात यांचे घर हे वॉररुम बनले होते. बाहेर जाणाऱ्या परप्रांतीयांच्या प्रवासाचा खर्च केला. अनेक ठिकाणी अन्नछत्र उघडले. अनेकांच्या तपासण्या केल्या. जेवणाची सुविधा केली. अशा विविध सुविधा पुरवताना जनसामान्यांन्यामध्ये आत्मविश्वास जागविला. अशातच चक्रीवादळ अतिवृष्टी या संकटात नामदार थोरात खंबीरपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. याचबरोबर निळवंडे धरणाचे पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी मोठा निधी मिळवून रात्रंदिवस काम सुरु ठेवले आहे. ऑक्टोंबर २०२२ मध्येच शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी काम सुरु होते. मात्र सरकार बदलले आणि काम थांबले.
निळवंडे धरण जिवनाचा ध्यास मानून काम करणाऱ्या आ. थोरात यांचे दुष्काळी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्याचे स्वप्न पूर्ण होणारच आहे. प्रत्येक संकटात शेतकऱ्यांचा नेता, जनसामान्यांचा नेता म्हणून नामदार थोरात यांचे सुसंस्कृत व्यक्तीमत्व चांदा ते बांदा अत्यंत लोकप्रिय ठरले. सुस्वभावी, शांत, संयमी, यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा सांगणारे हे नेतृत्व महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाच्या आणि जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले. अडचणीच्या काळात कॉंग्रेस पक्षाला आपल्या कार्य कार्तुत्वातून उर्जावस्था देणारे आमदार बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेस पक्षाचे खऱ्या अर्थाने यशस्वी प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत.
प्रा. नामदेव कहांडळ, जनसंपर्क अधिकारी

