महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये जय राजकारण झाले आहे ते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीनेच झालं असल्याचा दावा अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
खासदार विखे पाटील सध्या दिल्लीमध्ये असून तेथे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. विखे म्हणाले, ज्यावेळी विधान परिषदेचे राजकारण सुरू होते त्याचवेळी गौण खनिजाच्या प्रश्नावरून संगमनेर मध्ये काही ठेकेदारांचा मोर्चा प्रांताधिकारी कचेरीवर काढण्यात आला होता. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी या मोर्चाला मोबाईल वरून संबोधित केले होते. मग आज नेमकं असं काय झालं की, विधान परिषदेच्या घडणाऱ्या राजकारणावर ते बोलू शकले नाहीत. जर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला असेल तर मग ठेकेदारांना त्यांनी कसं संबोधित केलं.
त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे राजकारण झाले. ते राजकारण बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीने झालं आहे, हे नाकारता येणार नाही, असं विखे म्हणाले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब थोरात काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचे विधान केले होते. या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, काँग्रेस मधील राजकारण संदर्भात आपली भूमिका थोरात यांनी यापूर्वीच मांडायला हवी होती. त्यामुळे त्यांची पक्षावर किती निष्ठा आहे हे बोलण्यात अर्थ नाही.
यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये जिथे त्यांचे नातेवाईक काँग्रेस विरोधात उभे होते तिथे त्यांनी पक्ष बाजूला सारून नातेवाईकांनाच मदत केली असल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र, त्यांनी अर्ज न भरता मुलगा सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज भरला आणि काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर रविवारी संगमनेरमध्ये झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरकरांची ऑनलाईन संवाद साधताना याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीनेच विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस मधील राजकारण; भाजप खासदाराचा दावा
जिल्ह्यातील राजकारण पेटण्याची शक्यता

