महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
एका आयशर टेम्पोमधून कत्तलीसाठी नेली जात असलेली तब्बल पंचेचाळीस जिवंत गोवंश जनावरे राहुरी पोलिसांनी पकडली आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुन्हा एकदा संगमनेर कनेक्शन समोर आले आहे. यामुळे संगमनेरची बदकीर्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
संगमनेर येथून वांबोरी मार्गे अहमदनगर येथे चाललेल्या एका आयशर टेम्पोतून या जनावरांची निर्दयपणे वाहतूक केली जात होती. पोलीस हवालदार दिनकर चव्हाण, पोलीस नाईक नदिम शेख, सचिन ताजणे, गणेश लिपने, चालक साखरे या पोलीस पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील केएसबी चौकात रात्री दहा वाजेदरम्यान सापळा लावला होता.
त्यावेळी तेथे एक आयशर टेम्पो (एमएच 17 बीवाय 2478) आला. पथकाने त्या टेम्पोला थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश जनावरे आढळून आली. टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता त्याने सदर जनावरे संगमनेर येथील ग्रामीण भागातून शेतकर्यांकडून विकत घेऊन कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती दिली. पोलीस पथकाने 50 हजार रुपये किंमतीच्या 5 जर्सी गाई, 40 हजार रुपये किंमतीची 40 वासरे तसेच 5 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण 5 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस नाईक गणेश लिपने यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी महंमद रफिक उस्मान कुरेशी, वय 32 वर्षे, रा. मदिनानगर, ता. संगमनेर. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 130/2023 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 नूसार 11 (1) (एफ), महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम 1976 नुसार 5 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पकडलेल्या आयशरमधून जनावरांना घेऊन जाणारा आरोपी हा संगमनेरचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कत्तलीसाठी तालुक्यातून व इतरत्र भागातून संगमनेरात गोवंशांची जनावरे आणली जात असून त्यांची कत्तल केली जाते हे स्पष्ट झाले.

