महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मुंबई
महापुरुषांवरील सातत्याने केलेली टीका आणि विरोधकांच्या कायमच निशाण्यावर राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून महाराष्ट्राला आता रमेश बैस यांच्या रूपाने नवे राज्यपाल लाभले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करताना बैस यांच्यासह देशभरात तेरा राज्यात राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम बघितले आहे. ते महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल असतील. राज्यपाल कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात मोठं रान उठलं होतं. राज्यपालांना तातडीने पदावरून दूर करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्यासाठी राज्यभरात आंदोलने देखील झाली.
काही दिवसांपूर्वीच राज्यपालांनी दिल्ली दरबारी पत्र देत राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्तता करण्याची मागणी केली होती. त्यांनी आपला राजीनामाही पाठविला होता. अखेर आज त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
कोश्यारी यांनी राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी विविध नावे चर्चेत होती. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सभापती सुमित्रा महाजन यांच्यासह पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह काही नावांची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेरीस नव्या नियुक्तीनंतर ही सर्व नावे मागे पडली असून रमेश बैस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
कोण आहेत रमेश बैस!
○ बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे.
○ जुलै 2019 ते जुलै 2021त्रिपुराचे राज्यपाल.
○ रायपूर लोकसभेचे सहा वेळा खासदार.
○ ऑक्टोबर 1999 ते सप्टेंबर 2000 केंद्रीय रसायन राज्यमंत्री.
○ सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 केंद्रीय सूचना प्रसारण राज्यमंत्री.
○ जानेवारी 2004 ते मे 2004 केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री.
असे आहेत देशातील १३ नवे राज्यपाल
➡️ आयोध्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तीच्या बेंचमधील निवृत्त न्यायाधीश एस अब्दुल नजीर यांचा समावेश असून त्यांच्यावर आंध्र प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
➡️ निवृत्त लेफ्टनंट जर्नल कैवल्य त्रिविक्रम परनाईक अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असतील.➡️ लक्ष्मण प्रसाद आचार्य सिक्कीमचे राज्यपाल असतील.
➡️ सीपी राधाकृष्णन यांच्यावर झारखंडच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
➡️ शिवप्रताप शुक्ल यांना राज्यपाल म्हणून हिमाचल प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे.
➡️ गुलाबचंद कटारिया आसामचे राज्यपाल असतील.
➡️ आंध्र प्रदेशचे राज्यपाल असलेल्या बिस्वा भूषण हरिचंदन यांना आता छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
➡️ छत्तीसगडचे राज्यपाल असलेल्या अनुसुइया उइके यांच्यावर मणिपूरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
➡️ मणिपूरचे राज्यपाल म्हणून काम बघणारे गणेशन आता नागालँडचे राज्यपाल असतील.
➡️ बिहारचे राज्यपाल असलेल्या फागू चौहान यांच्यावर मेघालयची जबाबदारी सोपविण्यात आली.
➡️ हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम बघणाऱ्या राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर आता बिहारचे राज्यपाल असतील.
➡️ निवृत्त ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा लडाखचे नवे उपराज्यपाल असतील.

