“काँग्रेसचा विचार हाच आपला विचार” सांगत पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
काँग्रेसचा विचार हाच सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा व आपला विचार असून हा विचार पुढे न्यायचा आहे. असे म्हणत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांनी निर्माण केलेल्या पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. जिल्ह्यात विकास कामांना खीळ घालून जे दहशतीचे राजकारण शेजारच्या मंत्र्यांकडून सुरू आहे ते जिल्हा कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे यांचे नाव न घेता दिला.
खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर दीड महिन्याच्या कालावधीनंतर संगमनेरमध्ये आलेल्या काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरमधील कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व स्वागत केले. त्यानंतर यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात तालुक्यातील जनतेच्यावतीने झालेल्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, करण ससाणे, सचिन गुजर, ज्ञानदेव वाफारे, शरयू देशमुख आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, भारत जोडो यात्रेची महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावर होती. ३८१ किलोमीटर झालेली ही पदयात्रा अत्यंत यशस्वी झाली. यामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आपल्या अत्यंत चांगल्या नियोजनाची देश पातळीवर चर्चा झाली. या नियोजनामध्ये सत्यजित तांबे यांनी मोठा सहभाग घेतला. पदवीधर निवडणुकीनंतर आपण वरिष्ठांना पक्ष मजबुतीसाठी पत्र लिहिले असून तो पक्ष पातळीवर निर्णय होईल. मात्र माध्यमांनी त्याला जास्त प्रसिद्धी दिली. काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून याच विचारातून आपण पुढे जाणार आहोत.
सत्ता येते आणि जाते. इतक्या वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात आपण कधीही कुणाची वाईट केले नाही. मात्र काही लोक राज्याचे मंत्री आहेत की तालुक्याचे ते कळत नाही. त्यांचा राग फक्त संगमनेर तालुक्यावर आहे. तालुक्यासह जिल्ह्यातील विकास कामे त्यांनी थांबवली आहेत. हे दहशतीचे राजकारण जिल्हा कधीही सहन करणार नाही. जनता कधीही त्यांच्या दहशतीचे राजकारणाचे झाकण उडवून देईल.
ऑक्टोबरमध्येच निळवंडे धरणाचे पाणी आणायचे होते. मात्र या कामासाठी लागणारी खडी थांबवली असल्याने कालव्यांच्या कामासह जिल्ह्यातील अनेक विकास कामे बंद पडली आहेत. संगमनेर तालुका हा संघर्ष करणारा आहे. जिद्दीने लढणारा आहे. कितीही अडचणी आणल्या तरी संगमनेर तालुक्याच्या विकासाची घोडदौड सुरूच राहणार आहे.
डॉ. सुधीर तांबे यांनी पाच जिल्ह्यातील ५४ तालुक्यांमध्ये निर्माण केलेला जिव्हाळा, मैत्रीपूर्ण संबंध यामधून सत्यजित तांबे यांना मोठी मदत झाली असल्याने माजी आमदार डॉ. तांबे यांच्या कामाचा व संगमनेरच्या राजकारणाचा वारसा सत्यजित तांबे जोपासतील असा आशावाद व्यक्त केला.
सत्यजित तांबे म्हणाले, पदवीधर निवडणुकीच्या वेळी आमदार थोरात व तांबे परिवाराला अडचणीत आणण्याचे डाव काहींनी रचले. मात्र हे सर्व डाव जनतेने उधाळून लावले आहे. या निवडणुकीत पक्ष पाठीशी नव्हता. आमदार थोरात यांची दुखापत झालेली असल्याने ते प्रचारक नव्हते. अशा अडचणीतही सर्वपक्षीय जनतेने आपल्याला साथ दिली. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण संपून समाजकारण सुरू होते. ही संगमनेर तालुक्याची परंपरा आहे. माजी आमदार डॉ. तांबे यांनी निर्माण केलेला पाच जिल्ह्यांमध्ये मोठा ऋणानुबंध व आ. थोरात यांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आपण यापुढे जपणार आहोत.
आमदार कानडे म्हणाले, मागील महिन्यात काही वावटळी निर्माण झाल्या. मात्र आमदार थोरात यांचे नेतृत्व हे सर्वमान्य असून महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. राज्यातील डबल इंजिन सरकारने देशातील नागरिकांचे तोंड काळे केले. यावेळी डॉ. सुधीर तांबे, दादासाहेब मुंडे यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा ओहोळ यांनी, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर विश्वास मुर्तडक यांनी आभार मानले.
पाचशे युवकांची बाईक रॅली व १००० किलोचा पुष्पहार…
आमदार थोरात यांचे शहरात आगमन होताच तालुक्यातील ५०० युवकांनी मोटरसायकल रॅली काढून आमदार थोरात यांचे जंगी स्वागत केले. यावेळी यशोधन कार्यालयासमोर १००० किलोचा भव्य पुष्पहार घालून थोरात यांचा सत्कार करण्यात आला.

