महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मारुती कंपनीच्या रिट्स कारमधून संगमनेर पोलिसांनी गुरुवारी पहाटे गोमांस पकडले आहे. कारवाई दरम्यान कार चालक फरार झाला. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी फिर्याद दिली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर रायतेवाडी गावच्या शिवारात पोलीस पथक वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी पकडलेल्या संशयित रिट्स कारमधून राज्यात गोवंश जनावराच्या कत्तलीस बंदी असताना देखील या आदेशाचे उल्लंघन करून गोमांस वाहतूक होत असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले.
पोलिसांनी गोवंश जनावरांच्या गोमांस, कारसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन कार चालक पसार झाला असल्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
राज्यात होऊन जनावरांच्या हत्तेस बंदी असली तरी संगमनेरमध्ये मात्र या कायद्याचे उल्लंघन करत सर्रासपणे बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. या कत्तलखान्यांमधून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात गोमांस जात असल्याचे अनेकदा समोर येऊन देखील हे बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्यास प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.
कत्तलखान्यावरील कारवाईचा येथील आकडा देखील राज्यात सर्वात मोठा आहे. असे असले तरी वारंवार कारवाईत तेच तेच आरोपी निष्पन्न झाले असताना देखील या आरोपींवर ठोस कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. तसेच बहुसंख्य कारवाईत कत्तलखाना चालक पोलिसांना आढळून येत नसल्याने ते पोलीस दप्तरी फरार दाखवले जातात. कत्तलखाना आणि गोमांस वाहतुकीच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी होत असल्याचा पोलीस प्रशासनावर सातत्याने आरोप होत असतो.
गुरुवारी पहाटेच्या कारवाईत देखील पोलिसांना वाहन चालकास पकडण्यास अपयश आले. त्यामुळे वाहन चालक, वाहन मालक आणि कत्तलखाना चालक, मालकाचा शोध घेऊन पोलीस मुळापर्यंत जाणार का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.

